राज्यात पुढील २४ घंट्यांत वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता !

प्रतिकात्मक चित्र
  • पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालन्यात ‘यलो अलर्ट’
  • मुंबईतही पुढील २ दिवस वादळी पावसाची चेतावणी !

मुंबई – मुंबई, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांवर आजही अवेळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात पुढील २४ घंट्यांत वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यामध्ये वादळी वार्‍यासह पूर्वमोसमी पावसाची चेतावणी कायम आहे. तर उत्तर कोकणात उष्ण लाटेची चेतावणी हवामान विभागाने दिलेली आहे. १४ मेला राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आदी जिल्ह्यांना वादळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.

१४ आणि १५ मे या दिवशी पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवला आहे. ३ दिवसांपासून संध्याकाळी  पुण्यात पाऊस पडतो. मुंबईत पुढील २ दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी ५० ते ६० किमी/तास वेगाने वारा वाहील.