निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना औषधांचा पुरवठाच नाही !

केंद्र सरकारच्या योजनेचा उडालेला बोजवारा !

नाशिक – केंद्र सरकारच्या वतीने निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम’ (‘सी.जी.एच्.एस्.’द्वारे) द्वारे औषधे दिली जातात; मात्र गांधीनगर येथे असलेल्या बाह्यरुगण विभागात औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत.

१. केंद्रीय कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने नाशिकमध्ये गांधीनगर येथे बाह्यरुग्ण विभाग चालू केला. त्यासाठी खासगी रुग्णालयाची नेमणूक करण्यात आली; पण सध्या ही योजना अंमलात आणली जात नाही.

२. रुग्णांना या योजनेंतर्गत औषधे दिली जात नाहीत. प्रथम काहींना वेळेत औषधे दिली गेली; पण आता अनेक रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत.

३. नागरिकांनी औषधांची नावे दाखवल्यावर ती न देता त्यांना पर्यायी असलेली औषधे दिली जातात. ही योजना एकतर बंद करावी आणि नागरिकांचे पैसे परत द्यावेत, अन्यथा औषधांचा पुरवठा तरी नियमित करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चालू असलेल्या योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होतात का, हे प्रशासन कधी पहाणार ?