साधनेचे दृष्टीकोन समजून घेऊन त्यानुसार लगेच प्रयत्न करून स्वतःत पालट घडवणारे आनंदी कुटुंब – श्री. परशुराम पाटील, सौ. पूजा परशुराम पाटील आणि श्री. सूरज परशुराम पाटील !

‘एकदा आम्हाला (श्री. परशुराम पाटील आणि श्री. सूरज पाटील यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आम्ही त्यांना त्यांच्या कृपेने आमच्या कुटुंबियांमध्ये झालेल्या पालटांविषयी सांगितले. ती सूत्रे येथे दिली आहेत.

डावीकडून श्री. परशुराम पाटील, श्री. सूरज परशुराम पाटील आणि सौ. पूजा परशुराम पाटील

१. श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. जाणवलेले पालट

१ अ १. कुटुंबियांविषयी मनात येणारे काळजीचे विचार न्यून होणे आणि ‘देव सगळा भार सांभाळणार आहे’, अशी दृढ श्रद्धा मनात निर्माण होऊन निश्चिंत रहाता येणे : ‘माझ्या मनात ‘मला पत्नी आणि मुलगा आहे. माझी पत्नी (सौ. पूजा, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५१ वर्षे) घरी (बेळगाव) एकटीच असते’, असे विचार येत असत. मला या विचारांमुळे काळजी वाटत असे; मात्र काही दिवसांपासून मला ‘आम्ही साधना करत असल्याने आमचा सगळा भार देव सांभाळणार आहे. देवाने या आधीही कुटुंबियांची काळजी घेतली आहे आणि यापुढेही घेणार आहे’, अशी श्रद्धा वाटू लागली आणि मला कुटुंबाविषयी वाटणारी काळजी न्यून झाली.

१ अ २. प्रसंगाविषयी अंतर्मुखतेने विचार करणे : पूर्वी माझ्या पत्नीने मला माझ्यासंदर्भात एखादा प्रसंग सांगितल्यानंतर ‘कुणाचे चुकले ? तो कसा चुकला ?’, यावर मी दृष्टीकोन देत असे; मात्र आता ‘माझे काय चुकले ? मी कुठे अल्प पडलो ? त्या प्रसंगात मी काय करायला हवे ?’, असा विचार प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे अंतर्मुखतेने करून त्याप्रमाणे दृष्टीकोन दिला जातो.

१ अ ३. पत्नीला प्रत्येक प्रसंगाकडे साधनेच्या दृष्टीकोनातून पहाण्यासाठी प्रयत्न करायला सांगणे आणि पत्नीने तसे प्रयत्न केल्यावर तिला आनंद मिळणे : मी पत्नीला ‘आपण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो. साधना स्वतःत पालट करण्यासाठी करतो. इतरांना पालटण्यासाठी नाही’, असे सांगितल्यामुळे तिच्यातही पालट झाला. तिने मला सांगितले, ‘‘तुम्ही दृष्टीकोन सांगितल्यापासून ‘प्रसंग साधनेच्या दृष्टीकोनातून कसा हाताळायचा ?’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझ्या संबंधित व्यक्तीविषयी असलेल्या अपेक्षा आणि पूर्वग्रह न्यून होऊन मला आनंद मिळू लागला.’’

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला आशीर्वाद आणि त्यांच्या कृपेमुळे होत असलेले प्रयत्न : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘तू संत होणार आहेस’, असा आशीर्वाद दिला आहे. मला प्रतिदिन त्यांचे शब्द आठवतात आणि त्यानुसार मला प्रतिदिन सेवेत अन् वैयक्तिक जीवनात प्रयत्न करता येतात.

१. मला झोपेतून जाग आल्यावर ‘माझा नामजप चालू आहे’, असे लक्षात येते. मला कधी ‘झोपेत नामजप चालू नाही’, असे जाणवल्यास माझ्याकडून पुन्हा नामजप केला जातो.

२. पूर्वीपेक्षा माझ्यातील सकारात्मकता वाढली आहे. मला मिळणार्‍या आनंदात वाढ झाली आहे.

३. मला कोणत्याही प्रसंगाचा ताण येत नाही. ‘देव करून घेणार आहे’, असा माझा भाव असतो.

‘भगवंता, तू माझ्यात जो पालट केला आहेस आणि मला जो आनंद अनुभवता येत आहे’, ही ‘तुझीच कृपा आणि आशीर्वाद’ यांमुळे होत आहे, त्याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

२. श्री. सूरज पाटील ( श्री. परशुराम पाटील यांचा मुलगा ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. जाणवलेले पालट

२ अ १. सेवा झाल्यानंतर मनात येणारे नकारात्मक विचार सातत्याने कृतज्ञताभावात राहून प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केल्यावर न्यून होणे अन् सेवेतून आनंद मिळू लागणे : ‘पूर्वी मला सेवा करतांना आनंद मिळत होता; मात्र सेवा झाल्यानंतर आनंद हरवून जात असे. त्या वेळी माझ्या मनात अनावश्यक आणि नकारात्मक विचार येत असत. आता काही दिवसांपासून देवाने माझ्याकडून कृतज्ञताभावात रहाण्यासाठी प्रयत्न करून घेतले. मी ‘वाहन चालवतांना प्रार्थना करणे आणि सेवा पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे’, असे सातत्याने केल्याने माझ्या मनातील विचार न्यून होऊ लागले. मला सेवेतील आनंद मिळू लागला आणि मी सतत कृतज्ञताभावात राहू लागलो.

२ अ २. नोकरी करत असल्यामुळे सेवा अल्प होणे, देवाला प्रार्थना केल्यावर झोप अल्प होणे आणि ‘देवच सेवा करण्यासाठी शक्ती देत आहे’, असे अनुभवणे : मी नोकरी करत असल्यामुळे माझ्याकडून सेवा अल्प होते. काही वेळा रात्री काम केल्यावर माझी झोप पूर्ण होत नाही. साधक मला ‘तूझी झोप पूर्ण होत नाही का ? झोप पूर्ण कर. विश्रांती घे’, असे सांगत असत. त्या वेळी मी देवाला ‘देवा, तूच मला शक्ती दे. माझ्याकडून सेवा अल्प होते. तूच माझ्याकडून सेवा पूर्ण करून घे’, अशी प्रार्थना करत असे. तेव्हा माझी झोप अल्प होऊनही मला थकवा जाणवत नाही. ‘देव सेवा करण्यासाठी मला शक्ती देत आहे’, याची अनुभूती मला घेता आली.

२ अ ३. प्रसंगात बुद्धीच्या स्तरावर उपाययोजना काढतांना अडचणी येऊन निराशा येणे आणि देवाला आत्मनिवेदन करून प्रार्थना केल्यावर प्रसंगातून सहजतेने बाहेर पडता येणे अन् देवाप्रतीच्या कृतज्ञताभावात वृद्धी होणे : पूर्वी मी कोणताही प्रसंग घडल्यास बुद्धीच्या स्तरावर उपाययोजना करत असे; पण त्या वेळी अनेक अडचणी येत असत. त्यामुळे मला पुष्कळ निराशा येत असे. नंतर देवाने मला सुचवले, ‘प्रत्येक प्रसंग देवाला सांग.’ त्यानंतर मी प्रत्येक प्रसंग देवाला सांगून त्याला ‘यातून मला मार्ग मिळू दे’, अशी प्रार्थना करत असे. त्यामुळे मला ताण न येता मी प्रसंगातून सहजतेने बाहेर पडत असे. अशा प्रसंगामध्ये ‘देव माझ्या समवेत आहे आणि तोच हे प्रसंग सोडवत आहे’, अशी माझ्या मनात श्रद्धा निर्माण होऊन माझ्या देवाप्रतीच्या कृतज्ञताभावात वृद्धी झाली.

२ आ. श्री. परशुराम पाटील (श्री. सूरज यांचे वडील) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ आ १. साधकांबद्दल प्रतिक्रिया येणे आणि वडिलांनी सांगितलेल्या दृष्टीकोनानुसार प्रयत्न केल्यावर स्वतःत जाणवलेले पालट

२ आ १ अ. वाहनसेवा करत असतांना साधक वेळेवर आले नाहीत, तर प्रतिक्रिया येऊन प्रसंग स्वीकारता न येणे : मी ‘साधकांना निवासस्थानाहून आश्रमात पोचवणे आणि आश्रमातून निवासस्थानी पोचवणे’, ही सेवा करतांना काही वेळा साधक उशिरा येत असत. त्या वेळी माझ्या मनात लगेच प्रतिक्रिया येत असे. माझ्या मनात ‘साधकांनी वेळेत यायला हवे. ते वेळेत येऊ शकत नसल्यास, तसे मला कळवायला हवे. माझा वेळ वाया जातो’, असे नकारात्मक विचार येत असत.

(क्रमश:)

लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/793535.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक