बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !

प्रतिकात्मक चित्र

मिरज, २६ एप्रिल (वार्ता.) – बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी धनबाद एक्सप्रेसमधून कह्यात घेतले. रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मुलांना बालकल्याण समितीच्या कह्यात देण्यात आले आहे. येथील ‘चाईल्ड लाईन’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला.

धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे २४ एप्रिल या दिवशी मिरज रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पडताळणीच्या वेळी एका डब्यात ३२ अल्पवयीन मुले आढळून आली. त्यामुळे संशय आला. त्यांना कह्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्यासमवेत पालक नसल्याचे समजले. चौकशीत ही मुले कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेत जाणार असल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली. ते ‘चाईल्ड लाईन’च्या साहाय्याने स्थानकावर आले.