UKs Patients To India : ब्रिटनहून १२ सहस्र रुग्ण यावर्षी उपचारासाठी भारतात येणार !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये १५ सहस्र डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्यसेवा ढासळली आहे. अशा वेळी ब्रिटनचे रुग्ण चांगल्या आणि स्वस्त उपचारासाठी भारतात येत आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनहून सुमारे १ सहस्र २०० रुग्ण भारतात आले होते. या वर्षी हा आकडा दहापट वाढून १२ सहस्र होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील ‘एन्.एच्.एस्.’च्या (नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या) आकडेवारीनुसार या वर्षी मार्चपर्यंत ब्रिटनहून ३ सहस्र रुग्ण उपचारासाठी भारतात आधीच आले आहेत.

भारत आणि ब्रिटन यांच्यात वैद्यकीय कराराचे प्रयत्न चालू आहेत. ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन’ आणि ‘आय.आय.एम्. बेंगळुरू’ यासाठी अहवाल बनवत आहेत. लवकरच याचा अहवाल ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सोपवला जाईल. करार झाल्यानंतर ‘एन्.एच्.एस्.’ ब्रिटनहून भारतात जाणार्‍या रुग्णांच्या उपचाराचा खर्च उचलेल. यामुळे अधिक रुग्ण भारतात येतील. सध्या ‘एन्.एच्.एस्.’ युरोपमधील काही देशांत उपचारासाठीच खर्च देते.

लंडनचे जॉर्ज मार्शल म्हणाले, ‘‘मला हृदयविकार होता. ‘एन्.एच्.एस्.’ची ‘वेटिंग लिस्ट’ ८ महिन्यांची होती. दुसरा पर्याय लंडनच्या खासगी रुग्णालयात २० लाख रुपयांचा खर्च करून शस्त्रक्रिया करणे हा होता. मग मी जानेवारीत बेंगळुरूमध्ये जाऊन जवळपास ५ लाख रुपयांत शस्त्रक्रिया करून घेतली. यात विमान तिकिटाचा खर्चही समाविष्ट होता. मी ब्रिटनमधील ‘एन्.एच्.एस्.’ची सेवा आणि खासगी रुग्णालयांची सेवाही पाहिली; पण जी काळजी आणि सुविधा भारतात मिळाली, ती अनेक पटीने चांगली होती.’’