पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

  • हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, रणरागिणी शाखा, समविचारी संघटना आणि प्रशासन यांचा सहभाग

  • सलग २२ वर्षे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी जलाशयाचे संभाव्य प्रदूषण रोखले गेले !

आपलं खडकवासला !!!

पुणे : हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.

नारळ वाढवून मोहिमेला आरंभ

२२ व्या वर्षी सर्वांच्या प्रयत्नामुळे मोहीम यशस्वी झाल्यावर ‘केवळ ईश्‍वरी कृपेमुळेच ही मोहीम यशस्वी होत आहे. ईश्‍वरी संकल्प कार्य करत आहे, याचा आम्हाला अनुभव घेता आला, याची आम्हाला कृतज्ञता आणि समाधान वाटते’, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

संपूर्ण पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून सध्या ५६.३१ टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ २८.३९ टक्के इतके अल्प आहे. अशा वेळी जलाशय सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच समितीच्या या मोहिमेचे विशेष महत्त्व आहे. २२ वर्षांपासूनचे अथक प्रयत्न आणि प्रबोधन यांमुळे धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांमधील अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी हिंदू जागृत झाल्याचे दिसून आले आणि जलाशयाचे संभाव्य प्रदूषण रोखले गेले.

समाजहिताचा उपक्रम असल्यामुळे समाजातूनही भरघोस प्रतिसाद !

खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करण्यासाठी जी काही सिद्धता करावी लागते, त्यामध्येही धर्मप्रेमी, तसेच नागरिक यांनीही आपापल्या परीने आवश्यक ते साहाय्य केले. गेल्या २२ वर्षांपासून उन्हाची तमा न बाळगता समितीचे सर्व कार्यकर्ते मानवी साखळीद्वारे जलाशय रक्षणाचे कार्य करत आहेत. धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून गावागावांतून झालेला प्रसार, तसेच समितीच्या प्रबोधनामुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजाच्या हिताचा हा उपक्रम असल्यामुळे समाजातूनही याला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच ही मोहीम १०० टक्के यशस्वी झाली.

अशी झाली सांगता !

जलाशयाचे रक्षण करण्याचा धर्मप्रेमी, तसेच उपस्थित संघटना यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’मध्ये समितीचे सदस्य, तरुण आणि महिला खडा पहारा देऊन उपक्रमात सहभागी असतात. पाण्याची काळजी घेणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी उपस्थित संघटना,  तसेच धर्मप्रेमींनी वर्षभर अशाच प्रकारे पर्यावरण आणि संस्कृती रक्षणाचे उपक्रम ठिकठिकाणी राबवण्याचा निर्धार केला, ही समितीच्या कार्याची मोठी फलनिष्पत्ती आहे.

खडकसवासला जलाशयाच्या भोवती केलेली मानवी शृंखला

पोलीस-प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांचे सहकार्य !

पाटबंधारे विभागाच्या वतीने रंग खेळून पाण्यात उतरण्यास प्रतिबंध असल्याविषयीचा जागृतीपर फलक

या अभियानासाठी पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले. पोलिसांनी खडकवासला येथे नाकाबंदी करत या वर्षीही सहकार्य केले. त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. काही जणांनी अभियानस्थळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनकक्षाला भेट दिली आणि हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयीही जाणून घेतले. पाटबंधारे विभागाच्या वतीनेही रंग खेळून पाण्यात उतरण्यास प्रतिबंध असल्याविषयीचा जागृतीपर फलक लावण्यात आला होता. हिंदु जनजागृती समितीने याविषयी त्यांचे आभार व्यक्त केले.

नागरिकांचे प्रबोधन करतांना
अभियानस्थळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनकक्षाला भेट देतांना महिला पोलीस

मोहिमेमध्ये विशेष सहभाग !

‘हॉटेल ब्रह्म’चे महेंद्र वालदिया, ‘पायगुडे स्नॅक्स’चे निखिल पायगुडे, चेतन उणेचा, ‘राधाकृष्ण हॉटेल’चे नितीन जाधव, अमृत भेळ, शिवणे धायरी फाटा येथील व्यापारी संघटनेचे सारंग राडकर, अनिल जरांडे, धायरी फाटा येथील ‘विशाल सिंहगड विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान’चे सारंग नवले, उद्योजक अशोक कडू, परशुराम सेवा संघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश सुमंत, भाजप कोथरूडचे सरचिटणीस गिरीश खत्री, भाजप ओबीसीचे दत्ता कोल्हे, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिका

क्षणचित्रे

१. या मोहिमेत पुण्यातील विविध भागांतील १५० हून अधिक धर्मप्रेमी प्रत्यक्ष सहभागी झाले.

२. येणार्‍या-जाणार्‍या अनेक मान्यवरांनी मोहिमेचे कौतुक केले.

३. काही धर्मप्रेमी मोहिमेचा विषय ऐकून प्रत्यक्ष सहभागी झाले.

 

 

मोहिमेत सहभागी ‘जाधवर इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग’चे विद्यार्थी

४. ‘जाधवर इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग’ विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक मिळून ५० जणांनी मोहिमेत सहभाग नोंदवला. त्यांनी मानवी साखळी करत २ घंटे जनतेचे प्रबोधन केले.