वीर सावरकर यांच्या अवमानाविषयी राहुल गांधी यांना विचारला जाब !

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या महिला पत्रकाराला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘गोदी मिडिया’ म्हणून हिणवले !

साखी गिरि

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जाब विचारणार्‍या ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘गोदी मिडिया’ म्हणून हिणवले. या वेळी राहुल गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी साखी गिरि यांना प्रश्न विचारायला न देता बाजूला सारले. राहुल गांधी गाडीतून निघत असतांना त्यांच्या समक्ष हा प्रकार घडला.

१६ मार्च या दिवशी राहुल गांधी दादरमध्ये चैत्यभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन निघत असतांना हा प्रकार घडला. या वेळी राहुल गांधी यांच्या गाडीभोवती कार्यकर्त्यांची गर्दी होती. या गर्दीतून पुढे येऊन साखी गिरी यांनी राहुल गांधी यांना, ‘वीर सावरकर यांची क्षमा मागणार का ?’, असा थेट प्रश्न विचारला; मात्र त्यांना सुरक्षारक्षकांनी हटकले आणि धक्काबुक्की केली. वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्र दौर्‍यावर आले असतांना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून त्यांचा अवमान केला होता.

संपादकीय भूमिका :

  • स्वा. सावरकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस कधीच क्षमा मागणार नाही, हे लक्षात घेऊन सावरकरप्रेमींनी तिला निवडणुकीत जागा दाखवावी !
  • क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍यांना निर्भीडपणे जाब विचारणार्‍या राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांचे अभिनंदन !