जामखेड (अहिल्यानगर) येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

तक्रार प्रविष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना ४ दिवस आंदोलन करावे लागले !

डॉ. भास्कर मोरे

जामखेड (जिल्हा अहिल्यानगर) – ‘रत्नदीप मेडिकल कॉलेज’मधील विद्यार्थिनीला मुख्याध्यापक कार्यालयामध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेले ४ दिवस ‘रत्नदीप मेडिकल कॉलेज’चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. याला संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष जामखेड अधिवक्ता संघ यांनी पाठिंबा दिला होता. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनीही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

त्या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या. तक्रारींची नोंद घेऊन मुलींच्या तक्रारींसाठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांची नियुक्ती केली.

डॉ. मोरे यांच्याविरुद्ध केली होती मागील वर्षी तक्रार !

संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात गेल्या वर्षी महाविद्यालयातील मुलींनी विनयभंगाची तक्रार प्रविष्ट केली होती. (तक्रार दिली होती. तर एक वर्षे काहीच केले नाही का ? तक्रारीची नोंद घेऊन कृती न करणार्‍यांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !
  • मुलांना उपोषण का करावे लागले ? पोलिसांमध्ये विद्यार्थिनींवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध असलेल्या असंवेदनशीलतेमुळेच महिला असुरक्षित आहेत. ही पोलिसांची मानसिकता संतापजनक आहे. अशा पोलिसांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !