भररस्त्यात महाआरती परवडणार आहे का ? मग नमाज कसा चालेल ? – आमदार नीतेश राणे, भाजप

घाटकोपर (मुंबई) येथे हिंदू जनआक्रोश मोर्चात सहस्रावधी हिंदूंचा सहभाग !

मुंबई – देहलीच्या पोलीस अधिकार्‍याने नमाजपठण करणार्‍यांवर कारवाई केली म्हणून टीका केली जात आहे. भररस्त्यात हिंदूंनी महाआरती केली, तर परवडणार आहे का ? मग भररस्त्यात नमाज कसा चालेल ? असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी घाटकोपर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला. या मोर्चात मुंबईतील सहस्रावधी हिंदू या मोर्च्यात सहभागी झाले होते.

लव्ह जिहाद, लँड जिहाद, मशिदींवरील अवैध भोंगे, वक्फ बोर्डाकडून बळकावण्यात आलेली हिंदूंची भूमी आदी हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने १० मार्च या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला. हिंदु राष्ट्राचा जयघोष करत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू मोठ्या प्रमाणात या मोर्च्यात सहभागी झाले होते.

आमदार नीतेश राणे

या वेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये ठिकठिकाणी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी केली आहे. हिंदू माता-भगिनींना यांच्याकडून हे लव्ह जिहादमध्ये फसवण्याचे काम करत आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांवर प्रशासनाने कारवाई केली नाही, तर हिंदू कारवाई करतील. जेथे हिंदू जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले, त्या ठिकाणी माझ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली. हा मोर्चा हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आहे. माझ्यावर अवश्य गुन्हा नोंदवा; मात्र बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांच्यावर काय कारवाई केली ? हे प्रथम प्रशासनाने सांगावे. सनातन हिंदु धर्माला संपवण्याची भाषा केल्यास हिंदू गप्प बसणार नाहीत. यापुढे हिंदू ‘जशास तसे’ उत्तर देतील. मुंबईमध्ये फेरीवाल्यांच्या माध्यमातून हिंदू माता-भगिनींचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदु युवकांना नशेबाज करण्यासाठी मुंबईत अमली पदार्थांचे व्यवहार वाढत आहेत. पोलीस-प्रशासन यांनी अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केली नाही, तर आम्ही कारवाई करू.’’