रामनाथी आश्रमातील शिबिरांत सहभागी होणार्‍या साधकांना होणार्‍या त्रासाचे स्वरूप आणि साधकांना त्रास होऊ लागल्यास त्यांनी सतर्क राहून नामजपादी उपाय करायला प्राधान्य देणे आवश्यक !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित करण्यात येणार्‍या विविध शिबिरांत सहभागी होण्यासाठी अनेक जिल्ह्यांतून साधक येतात. साधकांची शिबिरासाठी निवड झाल्यापासून त्यांना रामनाथी आश्रमात येईपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही साधकांना आश्रमात आल्यानंतरही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे शिबिरात सहभागी होण्यास अडचणी येतात. त्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. अरुण कुलकर्णी

१. साधकांची शिबिरासाठी निवड झाल्यावर त्यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्यासाठी येत असलेल्या अडचणी

अ. गोवा येथे जाण्यासाठी गाडीचे आरक्षण न मिळणे.

आ. साधक किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती रुग्णाईत होणे.

इ. जवळच्या नातेवाइकांचा अपघात होणे किंवा नातेवाइकांचे निधन होणे.

ई. घरातून विरोध होणे इत्यादी.

२. आश्रमात आल्यावर शिबिरार्थींना होत असलेले त्रास

अ. जुनाट आजार उफाळून येणे.

आ. अकस्मात् काहीतरी शारीरिक त्रास चालू होणे, उदा. डोके जड होणे, पोट खराब होणे, सर्दी होणे, कणकण वाटून ताप येणे.

इ. शिबिरात शिकवत असलेल्या विषयांचे आकलन न होणे; मात्र शिबिराच्या कार्यस्थळापासून बाहेर गेल्यावर बरे वाटणे.

३. तेव्हा प्रत्येक शिबिराच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि काही साधक यांनी त्रास होत असलेल्या शिबिरार्थींना नामजपादी उपाय सांगितले.

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शिबिरात सहभागी होणार्‍या साधकांसाठी दिलेल्या सूचना

साधकांना शिबिरात सहभागी होण्यासाठी, तसेच रामनाथी आश्रमात आल्यावर होत असलेले त्रास पाहून सद्गुरु गाडगीळकाकांनी प्रत्येक शिबिरार्थीला दृष्टीकोन आणि सूचना द्यायला सांगितल्या. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले,

अ. ‘‘शिबिर म्हणजे एक धर्मयुद्ध आहे. साधक गुरुकार्याचा प्रचार करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायला रामनाथी आश्रमात येतात.  शिबिर म्हणजे धर्म-अधर्म यांच्यातील युद्धच आहे. शिबिराचे सभागृह, म्हणजे एक रणांगण आहे.

आ. शिबिराला येणार्‍या साधकांना त्रास होऊ लागल्यास त्यांनी सतर्क राहून नामजपादी उपाय करायला प्राधान्य द्यावे.

शिबिरार्थींनी ‘गुरुदेवांना शरण जाऊन त्रासाचे निवारण होण्यासाठी आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करणे, स्वतःवरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढणे, नामजप करणे, देवाच्या अनुसंधानात रहाणे’, असे उपाय करावेत, तरीही शिबिरार्थींना त्रास होत असल्यास त्यांनी संबंधित साधकांना नामजपादी उपाय विचारून घेऊन ते पूर्ण करावेत.’’

– श्री. अरुण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२०.२.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.