‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. १७ फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

भाग ५ पाहण्या करिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/765435.html

(भाग ६)

सौ. सुप्रिया माथूर

१४. प्रसंग – ‘मी पुष्कळ प्रयत्न केले; परंतु माझी प्रगती झाली नाही. परिस्थिती कारणीभूत आहे’, असा विचार असणे

१४ अ. दृष्टीकोन

१. ‘प्रगतीविषयी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक भाग, तसेच अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. वास्तवात परिस्थितीमुळे आपल्या मनावर परिणाम होत असतो.

२. इतर व्यक्तींमुळे आपल्या साधनेवर कोणताच परिणाम होत नाही.

३. बोध घेण्यास कुठे न्यून पडले ? व्यष्टी स्तरावर कुठे न्यून पडले ? फलनिष्पत्तीच्या मीमांसेचे चिंतन झाले का ? प्रगती बाह्यतः केलेल्या कृतींपेक्षा आंतरिक प्रक्रियेवर अधिक अवलंबून आहे.

४. ‘आपली सेवा किती घंटे झाली, यापेक्षा सेवेच्या कालावधीत माझे स्वभावदोष आणि अहं किती कार्यरत होते ?’, याचे चिंतन वाढले पाहिजे.

श्रीमती अश्विनी प्रभु

५. विकल्पामुळे अधोगती होते. त्यामुळे विकल्प आल्यावर, ‘मी ईश्वराला अपेक्षित असे सिद्ध झाले पाहिजे’, असा ध्यास वाढवला पाहिजे. त्यासाठी ‘संपूर्ण वर्ष कुठे न्यून पडले ?’, हे आंतरिक स्तरावर आधी काढले पाहिजे.

६. साधनेच्या प्रयत्नांत सातत्य आणायचे असल्यास स्वतःची न्यूनता स्पष्ट हवी. उगाच दुःखी होऊन बसण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जाणीव करून देऊन त्याला पुढील प्रयत्नांसाठी कार्यरत केले पाहिजे. स्वतःची चूक प्रत्येक ठिकाणी समजली पाहिजे आणि तिचा स्वीकार केला पाहिजे. ते समजल्यास पालट लवकर होतो.

७. स्वतःतील न्यूनतेकडून शिकले पाहिजे. ‘विकल्प (समष्टीमुळे माझी प्रगती झाली नाही) का आला ?’, याचे चिंतन लिहून काढावे. ‘कशामुळे आपल्या मनावर परिणाम झाला’, हे शोधले पाहिजे.

१५. प्रसंग – शिकवण्याची वृत्ती असणे

१५ अ. दृष्टीकोन

१. ‘शिकवण्याच्या वृत्तीमुळे मन आग्रही भूमिकेत जाते. ‘इतरांना न्यून लेखणे’, हा भागही असतो. साधनेत कुणी काहीही सांगितल्यावर मी ऐकण्याच्या स्थितीत असले पाहिजे.

२. आपल्या साधनेत कुटुंबियांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्यांचे साहाय्य घेण्याचा भाग वाढवला पाहिजे; परंतु आपल्यातील अहंमुळे त्यांचे साहाय्य आपण घेत नाही. त्यामुळे प्रगती होण्यासाठी अधिक काळ लागतो.

१६. प्रसंग – ‘स्व’वर नियंत्रण

१६ अ. दृष्टीकोन

१. मनाच्या स्तरावरील विचारांचे सतत निरीक्षण केले पाहिजे. ‘मला काय वाटते, यापेक्षा समोरच्याला काय वाटते ?’, त्यासाठी ‘चिकाटी’ हा गुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२. प्रयत्नांमध्ये फळाची अपेक्षा असल्यास प्रयत्नांत घसरण होते. ‘मी ‘स्व’ अर्पण करण्यासाठी साधनेत आले आहे’, हा विचार आपल्यात अल्प आहे.

३. सनातनच्या आश्रमांतील सर्व कार्यपद्धती आपल्या ‘स्व’चा नाश करण्यासाठीच आहेत. तो अर्थ आपल्या बुद्धीला समजावा, यासाठी प्रत्येक कार्यपद्धतीचे विश्लेषण केले पाहिजे.’  (क्रमशः)

– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू