Asam Corrupt Railway Officials : आसाममध्ये रेल्वेतील ७ अधिकार्‍यांनी केला ६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार !

गेल्या ७ वर्षांपासून चालू असलेल्या या प्रकारात उपमुख्य अभियंत्याचेही नाव !

गौहत्ती (आसाम) – येथे तैनात रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाने ७ अधिकार्‍यांच्या घरांवर धाड घातली. यामध्ये उपमुख्य अभियंता रामपाल, माजी अभियंता जितेंद्र झा, बी.यू. लष्कर, वरिष्ठ विभाग अभियंता ऋतुराज गोगोई, धीरज भगवती, मनोज सैकिया आणि मिथुन दास या अधिकार्‍यांचा समावेश आहे.

या सर्वांनी १ मे २०१६ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत ६० कोटी रुपयांहून अधिकची लाच घेतली. त्यांनी आसाममधील ‘भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट मर्यादित’ या आस्थापनाला रेल्वेच्या ‘जिरीबाम इंफाळ रेल्वे प्रकल्पा’साठी सर्व निविदा मिळवून दिल्या. तसेच आस्थापनाकडून मिळत असलेली देयके न तपासता ‘पास’ केली. यासाठी ते कमिशन घेत असत. लाचेची रक्कम पत्नी, मुलगा-मुलगी आणि इतर नातेवाईक यांच्या खात्यांवर जमा करण्यात येत असे.

संपादकीय भूमिका 

गेली ७ वर्षे असा प्रकार होत असणे, यातून हा भ्रष्टाचार केवळ उपमुख्य अभियंत्यापर्यंत सीमित नसणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या खात्यातील मुख्य अभियंता, अन्य वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री यांचीही चौकशी झाली पाहिजे !