वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, घटनातज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचे ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

जालना – ‘वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचे ऐकण्याची आवश्यकता नाही. घटनातज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचे आहे’, असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गावकर्‍यांशी संवाद साधतांना म्हटले आहे. जिल्ह्यातील अंतरवाली येथे पोचताच मनोज जरांगे यांनी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, घटनातज्ञ उल्हास बापट आणि विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया पहा. बाकीचे वाया गेलेले लोक आहेत, यांचे मनावर घ्यायची आवश्यकता नाही. कायदा पारित झाला हा मराठ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आता करायचे असल्यास कुणीही आव्हान देऊ शकतो, न्यायालयामध्ये जाऊ शकतो. सर्व अध्यादेशाच्या आदेशाचे कायद्यात रूपांतर झाले म्हणजे मराठ्यांचा सातबारा पक्का झाला.