मराठा आरक्षणाचा लाभ होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील

जालना – जोपर्यंत या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा लाभ होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू रहाणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण मिळाले की, आंदोलनाचे काय करायचे हे ठरवू. या आंदोलनाविषयी आपल्याला गाफील रहाता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना या कायद्याचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सगेसोयर्‍यांना सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असे मनोज जरांगे पाटील यांनी येथे स्पष्ट केले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, गाफील राहिले, तर आंदोलन फसते. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याविना होत नाही. सरकारने कायदा केला. त्यांचे कौतुक केले; पण त्याची कार्यवाही होईपर्यंत आपण सावध रहायचे आहे. ‘आरक्षण मिळाल्यावर रायगड येथे जाईन’, असे म्हटले होते. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी मी ३० जानेवारी या दिवशी रायगड येथे जाणार आहे.

सरसकट गुन्हे मागे घेतले नाही, तर आंदोलन चालूच रहाणार ! – मनोज जरांगे

जालना – ‘मराठा तरुणांवरील सरसकट गुन्हे मागे घेतले नाही, तर आमचे आंदोलन आणि दणका देणे चालूच रहाणार आहे’, अशी चेतावणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

‘‘जिल्ह्यातील अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा तरुणांवर प्रविष्ट झालेले गुन्हे मागे घेणार आहे’, असे आश्वासन सरकारने दिले आहे, असे तुम्ही म्हणता; पण सरसकट गुन्हे मागे घेणार नाही, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर तुमचे मत काय आहे ?’, असा प्रश्न पत्रकारांनी मनोज जरांगे यांना विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले.