जनतेच्या मनावर रामाचे अधिराज्य ! – आशुतोष बापट, भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक  

समृद्ध इतिहासातून उलगडले अयोध्येचे रामायण

श्री. आशुतोष बापट

रत्नागिरी – अयोध्या फार पूर्वीपासून असून प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने अयोध्यानगरी पावन झाली. अयोध्या आणि प्रभु रामाचा उल्लेख इतिहास साहित्य, काव्यरचना, ऐतिहासिक, परकीय अभ्यासकांनी त्यांच्या त्यांच्या काळात केला आहे. अथर्ववेद, तैत्तरीय आरण्यक, महाभारत वनपर्व, सभापर्व, स्कंद पुराण, लोमश रामायण यामध्येही अयोध्येचा उल्लेख आहे. ऐतिहासिक संदर्भसुद्धा आहेत. प्रभु रामाचे हे संदर्भ खूप काही सांगून जातात. जगभरातील लोकांच्या मनावर प्रभु रामाचे अधिराज्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक अन् संशोधक श्री. आशुतोष बापट यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ६७ व्या वर्षी कालिदास स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी पहिल्या दिवशी ‘अयोध्येचे रामायण’ या विषयावर व्याख्यान दिले.

रामायण

श्री. बापट म्हणाले की,

१. विचारवंत राम आणि रामायण काल्पनिक असल्याचे सांगतात; परंतु सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यामध्ये अयोध्या आणि रामायण या विषयक अनेक पुरावे दिल्यामुळे श्रीराममंदिर पुन्हा उभारण्यात आले.

२. ‘राम नाही’, या विचाराला त्या वेळच्या लोकांनी विरोध केला नाही, याचे आश्चर्य वाटते. पुराण संदर्भानुसार अयोध्या म्हणजे भगवान विष्णूचे मस्तक मानले जाते. शिलालेख, नाणी यांचे पुरावे खरे मानले जातात. परंतु विचारवंतांनी ३ खोटे शिलालेखही सादर केले होते; परंतु ते खोटे असल्याचे सिद्ध झाले.

३. हिंदूंप्रमाणे जैन, बौद्ध धर्मियांसाठी अयोध्या महत्त्वाची आहे. जैन रामायणही सांगितले जाते आणि बौद्ध धर्मीयही त्यांच्या परंपरा सांगतात. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांच्यात प्रभु रामाचा उल्लेख झाला. पट्टकल येथे सातव्या शतकात बांधलेल्या विरूपाक्ष मंदिरात राम-लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती कोरल्या आहेत. वेरूळच्या कैलास लेण्यांमध्ये रामायण पट कोरला आहे.