Vishalgad : विशाळगडावर ‘हजरत पीर मलिक-ए-रेहान’च्या नावाने भरणार्‍या उरूसावर बंदी घाला !

विशाळगड मुक्ती आंदोलनाची कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

(उरूस म्हणजे मुसलमानांनी साजरा केलेला उत्सव)

उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर गेली अनेक वर्षे हजरत पीर मलिक रेहान याच्या नावाच्या अवैधरित्या दर्ग्यात उरूस भरवला जातो. या उरूसामध्ये सहस्रो कोंबड्या आणि बोकड यांचा बळी दिला जातो, तसेच मांस शिजवले जाते. या उरूसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांकडून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते. यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट होते. तरी विशाळगडावर ‘हजरत पीर मलिक-ए-रेहान’च्या नावाने भरणार्‍या उरूसावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन विशाळगड मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. (ज्या गोष्टी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनास येतात, त्या गोष्टी सर्व यंत्रणा असलेल्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? निधर्मी शासन प्रणालीत हिंदूंना कायदा आणि धर्मांधांना फायदा, असे आणखी किती दिवस चालणार आहे ? – संपादक)

१. जिल्हाधिकारी यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडावर असलेल्या भाड्याने दिल्या जाणार्‍या अवैध खोल्यांमध्ये जुगार आणि पत्ते खेळले जातात. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर पशूहत्या बंदी केली असून प्राण्यांचे मास शिजवण्यावर बंदी केली आहे. तरी यंदा २३, २४, २५ जानेवारी या कालावधीत तेथे उरुस भरवला जाण्याची दाट शक्यता असून त्यावर प्रशासनाने तात्काळ बंदी घालावी.

२. या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, सर्वश्री विष्णुपंत पाटील, गजानन तोडकर, संजय जाधव, परशुराम चोरगे, राजू जाधव, अमित सूर्यवंशी, सोमनाथ गोठखिंडे यांसह अन्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ?