कु. पूनम मुळे यांना रथोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती !

१. रथोत्सवाची दिंडी म्हणजे साधनाप्रवास वाटून ‘देवासाठी आनंदाने अन् भावपूर्ण गात रहावे’, असे वाटणे : ‘२२.५.२०२२ या दिवशी रथोत्सव होता. त्या वेळी मला रथोत्सवात नृत्य करण्याची वेळ आल्यावर एका ठिकाणी थांबल्यावर माझ्या पायाला थोडे चटके बसले. तेव्हा ‘ही दिंडी म्हणजे माझा साधनाप्रवास आहे’, असे मला वाटले. या साधनाप्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या पाठीशी आहेत. आपण स्वभावदोष, अहं आणि प्रारब्ध यांमुळे होणार्‍या संघर्षामुळे दुःखी अन् निराश होतो. आज मला दिंडीत थोडे ऊन लागून चटके बसत आहेत, तरीही गुरुमाऊली रथात बसून आपल्या पाठीशी आहे, या विचाराने मला उन्हातही आनंद जाणवत होता. मध्ये मध्ये माझ्या पायाला खडे टोचत होते. दिंडीत गातांना मला दम लागत होता, तरीही ‘देवासाठी गातच रहायचे आहे’, असे मला वाटले. त्यामुळे ‘मला आनंदाने आणि भावपूर्ण गायचे आहे’, या जाणिवेने मन उत्साही होते.

कु. पूनम मुळे

२. दिंडीत मधून मधून गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केल्यावर ‘ते मला देहभान हरपून आनंदाने दिंडीत सहभागी होण्यास शिकवत आहेत’, असे जाणवत होते.

३. शेवटी दिंडी रामनाथी आश्रमाकडे जाऊ लागल्यावर ‘ही दिंडी संपूच नये आणि गुरुदेवांच्या भक्तीत अन् त्यांच्या भजनात तल्लीन होऊन अखंड चालत रहावे’, असे मला वाटत होते.

४. साधिकेने वारकर्‍याप्रमाणे दिंडीत नामस्मरण आणि भजन यामध्ये तल्लीन होणे : ‘दिंडीत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्याचे नामस्मरण आणि भजन यांमध्ये मग्न होऊन सहभागी होत असतात, तसेच आपल्यालाही दिंडीत भावस्थितीत रहायचे आहे’, असे मला वाटले. त्याच वेळी ध्वनीक्षेपकावरून वारकर्‍यांविषयी सांगितले गेले आणि विठ्ठलाचा जयघोष झाला.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून सर्वांना पुष्कळ आनंद होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी सर्व जण व्याकुळ झाले होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

६. देवाला आर्ततेने आळवून कृतज्ञतेने भावजागृती अनुभवता येणे : इतर वेळी माझी भावजागृती होते. तेव्हा माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या जाणिवेने देवाला आर्ततेने आळवले जाते; पण या दिवशी कृतज्ञतेने भावजागृती अनुभवता आली.’

– कु. पूनम मुळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक