Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाचा मारा सहन करत सागरी कासवाच्या मादीने घातली ९८ अंडी !

ध्वनिप्रदूषणामुळे सागरी कासवांना अंडी घालण्यात अडचण

पेडणे, ३१ डिसेंबर (वार्ता.) : ध्वनीप्रदूषणाचा मारा सहन करत अखेर मोरजी किनार्‍यावर टेमवाडा परिसरात एका सागरी कासवाच्या मादीने ९८ अंडी घातली आहेत.

मोरजी आणि आश्‍वे समुद्रकिनार्‍यांवर वर्ष १९९८ पासून राबवली जाते कासव संवर्धन मोहीम

मोरजी पंचायत क्षेत्रात टेंबवाडा परिसरात वर्ष १९९७ पासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २००० मध्ये ५०० चौ.मी. भूमी कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केली आणि यानंतर सरकारचा वन विभाग, स्थानिक नागरिक आणि पर्यटन हंगामातील शॅक व्यावसायिक हे या ठिकाणी आजपर्यंत ही मोहीम राबवत आहेत. मोरजीबरोबरच आश्‍वे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. यामुळे हे दोन्ही किनारे संवेदनशील किनारे म्हणून घोषित झालेले आहेत.

(सौजन्य : City News Goa)

या ठिकाणी समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते अणि त्यात अंडी घालून निघून जाते. निसर्ग प्रक्रियेनुसार ५० ते ५२ दिवसांनी अंड्यांतून आपोआप पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले बाहेर पडल्यानंतर रात्री समुद्राच्या चकाकणार्‍या पाण्याच्या दिशेने आपोआप निघून जातात; मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे आणि विद्युत् रोषणाई दिसते. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी पिल्लांना समुद्रात सोडतात.