‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे सात्त्विक समाज अन् त्याची वैशिष्ट्ये !

१. सत्त्व, रज आणि तमप्रधान व्यक्तींच्या व्याख्या

‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे सात्त्विक समाजाची निर्मिती ! सात्त्विक समाज म्हणजे काय ? सात्त्विक समाज, म्हणजे सात्त्विक आचरण करणारा समाज ! प्रत्येक व्यक्तीत सत्त्व, रज आणि तम असे ३ गुण असतात. तमप्रधान व्यक्तीचे आचरण, म्हणजे इतरांना त्रास आणि दुःख देऊन स्वतः सुख मिळवणे. रजप्रधान व्यक्तीचे आचरण म्हणजे स्वार्थ. स्वतःसाठीच सर्व करणे आणि करवून घेणे. सत्त्वप्रधान व्यक्ती, म्हणजे ‘मला त्रास झाला, तरी चालेल; अडचण आली, तरी चालेल; परंतु इतरांना अथवा समाजाला त्रास होऊ नये’, अशी इच्छा करून भगवंताच्या चरणी निरंतर कृतज्ञता व्यक्त करत जीवन व्यतित करणार्‍या व्यक्ती !’

श्री. गुरुप्रसाद गौडा

२. सत्त्वप्रधान व्यक्तींमुळे समाजाची सात्त्विकता वाढणे आणि तमप्रधान व्यक्तींमुळे तामसिकता वाढणे

केवळ सत्त्वप्रधान व्यक्तीला निरंतर भगवंताचे स्मरण होते आणि भगवंतसुद्धा या व्यक्तीच्या माध्यमातून समाजात सात्त्विकतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेमुळे सात्त्विकता वाढून त्या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. तमप्रधान व्यक्तीत तामसिकता वाढून त्या व्यक्तीच्या माध्यमातून वाईट शक्ती समाजस्वास्थ्य बिघडवणे आणि धर्म नष्ट करणे यांसाठी निरंतर प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे पाप वाढून, तो भगवंतापासून दूर जाऊन अधोगतीला जातो.

३. प्रत्येक प्राणीमात्राच्या उन्नतीसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता असणे

‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे सत्त्वप्रधान राष्ट्र, सत्त्वप्रधान समाज, सत्त्वप्रधान व्यवस्था, सत्त्वप्रधान आचरण, सत्त्वप्रधान वातावरण आणि सत्त्वप्रधान स्थिती ! ‘हिंदु राष्ट्र’, म्हणजे मनुष्यासह इतर सर्व प्राणी, पक्षी, जीव-जंतू, वृक्ष-वेली, कृमी-कीटक यांनाही सात्त्विकता अनुभवता येईल’, अशी स्थिती आणि व्यवस्था !’ या सत्त्वप्रधान व्यवस्थेत प्रत्येक जिवाची सात्त्विकता वाढून त्याला भगवंताकडे मार्गक्रमण करण्यास साहाय्य होते आणि त्या जिवाची आध्यात्मिक उन्नतीसुद्धा होते. त्यामुळे समस्त जीव संकुलाच्या (जगताच्या) आध्यात्मिक उन्नतीसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. अशा हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करणार्‍यांची आणि परिश्रम घेणार्‍यांची उन्नती साक्षात् भगवंतच करून घेतो. त्यासाठी ‘सात्त्विक समाजाची निर्मिती’, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे.

४. प्रत्येक युगात भगवंताने समाजाचे अस्तित्व अबाधित ठेवणे आणि समाजाचा समतोल राखणे, यासाठीच त्याने तामसिक व्यक्तींचा वध केला असणे

समाज सात्त्विक करण्यासाठी सात्त्विक आचरणाविषयी सांगितले पाहिजे आणि तसे आचरण केले पाहिजे. वर्तमानकाळातील कलियुगात सात्त्विक आचरणाविषयी सांगितले, तरी त्याचा स्वीकार न करता द्वेष करणार्‍यांची संख्या अधिक आहे. कलियुगात पुनःपुन्हा सांगूनही सात्त्विक आचरणाकडे दुर्लक्ष करून तामसिक आचरण करणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्व समाजच सात्त्विक आचरण न करता तामसिक आचरण करतो. प्रत्येक युगात तामसिक आचरण करणार्‍या व्यक्तींचा वध भगवंतानेच केला आहे. ही प्रक्रिया केवळ समाजाचे अस्तित्व अबाधित ठेवणे आणि समाजाचा समतोल राखणे, यांसाठीच आहे. हीच आमची परंपरा ! हेच आमचे गतवैभव !

५. ‘सात्त्विक समाजाच्या निर्मितीसाठी सात्त्विक व्यक्तींना जोडणे, समाजाला सात्त्विक विचार सांगणे आणि समाजाकडून सात्त्विक आचरण करवून घेणे’, ही आपणा सर्वांची कलियुगातील सर्वांत मोठी समष्टी साधना आहे.

६. समाजाला साधना सांगणे

समाजाला सात्त्विक करण्यासाठी भगवंत आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांनी केलेले मार्गदर्शन, म्हणजे ‘समाजाला साधना सांगणे’, हा एकच पर्याय आहे. या प्रक्रियेमुळे आपली आध्यात्मिक उन्नती होतेच, त्यासह मनुष्य जन्माची सार्थकतासुद्धा साधली जाते.’

– श्री. गुरूप्रसाद गौडा, मंगळुरू, कर्नाटक. (३०.७.२०२३)