Rajouri Terrorist Attack : राजौरीमधील आतंकवादी आक्रमणामध्ये ५ सैनिकांना वीरमरण !

  • २ सैनिकांचे मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळले !

  • आतंकवाद्यांनी लुटून नेली शस्त्रे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरच्या राजौरीमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी २१ डिसेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास सैन्याच्या २ वाहनांवर केलेल्या आक्रमणात ५ सैनिकांना वीरमरण आले आहे, तर २ सैनिक गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. भारतीय सैन्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सैनिक आणि आतंकवादी यांच्यामध्ये समोरासमोर चकमक झाली. २ सैनिकांचे मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत सापडले. आतंकवाद्यांनी सैनिकांजळील शस्त्रे पळवून नेली.

हे आक्रमण राजौरीच्या थानमंडी-सुरनकोट मार्गावरील डेरा की गली (डीकेजी) नावाच्या परिसरात झाला. सैनिकांना घेऊन जाणारी ही वाहने सुरनकोट आणि बाफलियाज यांकडे जात होती. या ठिकाणी सुरक्षादलांनी २० डिसेंबरच्या रात्री आतंकवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम प्रारंभ केली होती. २१ डिसेंबरला तेथे अतिरिक्त सैनिक पाठवण्यात येत होते. या सैनिकांच्या वाहनावर हे आक्रमण झाले.

या आक्रमणाच्या आधी म्हणजे १९ डिसेंबरच्या रात्री पूंछमधील सुरनकोट भागातील पोलीस तळावर स्फोट झाला होता.  हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, पोलीस छावणीत उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

संपादकीय भूमिका

‘काश्मीरमधील आतंकवाद आता अल्प झाला आहे’, असे कुणी कितीही म्हटले, तरी ‘ते खोटे आहे’, हेच या घटनेद्वारे जिहादी आतंकवादी सांगत आहेत. काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

२५० ते ३०० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत !

सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने गुप्तचरांचा हवाला देत काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, २५० ते ३०० आतंकवादी पाकिस्तान सीमेवर लॉन्चपॅडवर (प्रशिक्षित आतंकवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी एकत्र आणण्याचे ठिकाण ) आहेत. ते काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरक्षादलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल.

संपादकीय भूमिका

गेल्या अनेक वर्षांपासून काही मासांच्या अंतराने अशा माहिती समोर येत असते. याचाच अर्थ काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने कितीही आतंकवादी ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये नवीन आतंकवादी निर्माण झालेलेच असतात आणि ते कारवाया चालू ठेवतात. यासाठी या आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे !