बकर्‍यांचा बळी देण्यावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !

कोलकाता – बंगालच्या दिनाजपूरमध्ये १० सहस्र बकर्‍यांचा बळी दिला जातो. त्यावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने नकार दिला आहे; मात्र ‘न्यायालय पूजा समितीला कायद्यानुसार व्यवस्था करण्यास सांगू शकते’, असे खंडपिठाने म्हटले आहे.

१. दक्षिण दिनाजपूरमध्ये रासपौर्णिमेनंतर बोल्ला गावात काली पूजन होते. त्या पूजेत १० सहस्र बकर्‍यांचा बळी दिला जातो. यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित  याचिका एका स्वयंसेवी संघटनेने कोलकाता उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती.

२. याचिकाकर्त्याने म्हटले होते, ‘अनुमतीविना कुठेही प्राण्यांचा बळी देता येत नाही. प्राण्यांवरील अत्याचार थांबले पाहिजेत.’ (हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्‍या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्‍यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ? – संपादक)

३. या प्रकरणी सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती टी.एस्. शिवाज्ञानम् यांच्या खंडपिठाने सण चालू झाला असल्याने अशा परिस्थितीत बळी प्रथा थांबवणे शक्य नसल्याचे सांगितले.