डॉ. विजय अनंत आठवले यांनी सांगितलेली आठवले परिवाराची वैशिष्‍ट्ये !

कु. तेजल पात्रीकर यांनी डॉ. विजय आठवले (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पुतणे आणि सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले यांचे पुत्र) आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा यांच्‍याशी ‘आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उन्‍नत आठवले परिवार’ याविषयी केलेला वार्तालाप !

२२.७.२०२२ या दिवशी सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका) यांचे पुत्र डॉ. विजय आठवले आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा विजय आठवले हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. त्‍या वेळी त्‍यांच्‍याशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.) यांनी संवाद साधला. तेव्‍हा त्‍यांनी सांगितलेली आठवले परिवाराची वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. २० नोव्‍हेंबर या दिवशी आपण या वार्तालापात सनातन संस्‍था, रामनाथी आश्रम सनातनचे साधक आणि पू. भाऊकाका यांच्‍याविषयीची सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/739163.html
डॉ. विजय आठवले
कु. अनघा आठवले

५. पू. भाऊकाकांमध्‍ये जाणवलेले पालट

कु. तेजल पात्रीकर : पू. भाऊकाकांमध्‍ये आता पालट जाणवत आहे ना, त्‍याविषयी आपण सांगावे. पूर्वी पू. भाऊकाका कार्यालयीन काम करत होते आणि त्‍यांची आताची स्‍थिती यांमध्‍ये काही पालट उदाहरणासह आपण सांगू शकाल का ?

५ अ. पूर्वीपेक्षा शांत झाले असणे

डॉ. विजय आठवले : पूर्वी आम्‍हाला कधी रेल्‍वे पकडून जायचे असेल, तर ते (पू. भाऊकाका) २ घंटे आधीपासूनच तयार होऊन फेर्‍या मारत रहायचे आणि आम्‍हाला सांगायचे, ‘‘चला, चला, उशीर होईल.’’ काही मर्यादेपर्यंत ही सवय माझ्‍यामध्‍येही आहे. आता काळ पुष्‍कळ पालटला आहे. पूर्वी रेल्‍वेगाडीची नक्‍की वेळ कळत नसे. आता गाडी उशिरा येणार असेल, तर आपल्‍याला लघुसंदेश येतात. माझे वडील महाविद्यालयात शिकत असतांना ते रेल्‍वेने सर्वसामान्‍य (जनरल) डब्‍यातून प्रवास करायचे. तेव्‍हा ते रेल्‍वे येण्‍यापूर्वीच तेथे जाऊन उभे रहायचे आणि रेल्‍वे आल्‍यानंतर पटकन आत जाऊन आसन मिळवायचे. त्‍या काळात त्‍यांना सवय होती. आता ते पूर्वीपेक्षा शांत झाले आहेत.

कु. तेजल पात्रीकर : आणखी काही त्‍यांच्‍या सान्‍निध्‍यात वेगळे अनुभवायला आलेे किंवा असा काही तुम्‍हाला आध्‍यात्मिक स्‍तरावर अनुभव आला आहे का ?

डॉ. विजय आठवले : ‘मी याचे उत्तर योग्‍य प्रकारे देऊ शकेन का ?’, हे मला ठाऊक नाही. हे सर्व माझ्‍या परिवारातील सदस्‍य आहेत, तर त्‍यांच्‍यातील व्‍यक्‍तीगत गोष्‍टी माझ्‍या प्रथम लक्षात येतात. आपण परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ‘परम पूज्‍य’ म्‍हणता आणि माझ्‍याकडून त्‍यांना अधिक वेळा ‘जयंतकाका’, असेच म्‍हटले जाते. त्‍यामुळे अशा प्रकारे लक्षात येणे, ही फार कठीण गोष्‍ट आहे.

६. आजोबांनी (‘प.पू. (कै.) बाळाजी वासुदेव आठवले’ यांनी) पुष्‍कळ कष्‍ट करून मुलांचे शिक्षण पूर्ण करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील पू. बाळाजी आठवले आणि आई पू. (सौ.) नलिनी आठवले

डॉ. विजय आठवले : ‘आम्‍ही लहान होतो. तेव्‍हा माझे आजोबा एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. माझ्‍या वडिलांना ४ भावंडे होती. आजोबांना या ५ मुलांचे शिक्षण आणि सर्व खर्च करावा लागत होता. माझे सर्व काका आधुनिक वैद्य आणि माझे बाबा अभियंता झाले. त्‍यांच्‍या शिक्षणासाठी आजोबांना पुष्‍कळ कष्‍ट करावे लागले. माझे वडील सांगतात की, ‘आम्‍ही सकाळी उठण्‍यापूर्वी ते शिकवण्‍यांसाठी घरातून गेलेले असायचे आणि आम्‍ही शाळेत गेल्‍यानंतर ते घरी यायचे. आम्‍हाला आठवडाभर आमच्‍या वडिलांचा चेहराही दिसत नव्‍हता.’ त्‍यांनी एवढे परिश्रम केले आहेत.

७. प्रेमभाव असलेल्‍या आणि चांगले संस्‍कार करून मुलांना घडवणार्‍या पू. ताई (पू. (कै.) नलिनी बाळाजी आठवले) !

कु. तेजल पात्रीकर : हो. म्‍हणजे त्‍यांचा तो कर्मयोगच होता. त्‍यांनी एवढे सर्व मुलांसाठी केले. तुमच्‍या आजींची काही वैशिष्‍ट्ये सांगाल का ?

डॉ. विजय आठवले : हो. माझ्‍या आजीविषयी बोलायचे झाले, तर तिचे सर्वांत मोठे वैशिष्‍ट्य हे आहे की, ती सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलायची. सासू आणि सून यांच्‍या नात्‍यामध्‍ये निखळ प्रेम होते. ती सुनेचीही प्रशंसा करत असे.

कु. तेजल पात्रीकर : हो. मुलांवर ‘अधिकतर संस्‍कार आईकडून होतात’, असे यातून लक्षात येते.

डॉ. विजय आठवले : वडील आठवडाभर भेटत नसतील, तर ‘घरातील संस्‍कार, संस्‍कृती आणि धर्म यासंदर्भात स्‍त्रियाच मुलांना घडवू शकतात. धर्मरक्षण करण्‍यात स्‍त्रियाच पुढे असतात. माझी आजी गणपतीची पूजा नित्‍यनेमाने करत होती. त्‍याचा प्रभाव मुलांवर पडला असेलच.

८. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सर्व  भावांमध्‍ये जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

कु. तेजल पात्रीकर : आपण मला सांगावे, हे सर्व प.पू. डॉक्‍टरांचेे भाऊ आहेत. सर्व भावांमध्‍ये एक गुण विशेष आहे आणि तो म्‍हणजे प्रत्‍येक जण कोणत्‍या तरी साधनामार्गावर आहे. त्‍याविषयी थोडेसे सांगा.

डॉ. विजय आठवले : ते सांगायला मी पात्र आहे कि नाही, हे मला ठाऊक नाही. ते सर्व जण अध्‍यात्‍मात पुष्‍कळच पुढे गेलेले आहेत.

कु. तेजल पात्रीकर : हो. पण त्‍यांची काही स्‍वभाववैशिष्‍ट्ये आपण सांगू शकता.

८ अ. सर्वाधिक शिकलेले, ऐकण्‍याची वृत्ती, उत्तम रुग्‍णचिकित्‍सक आणि उन्‍नत आध्‍यात्मिक स्‍थिती असलेले सद़्‍गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले (सद़्‍गुरु अप्‍पाकाका) !

डॉ. विजय आठवले : मला जेवढे आठवते, त्‍यातून सांगायचे झाले, तर अप्‍पाकाका या भावांमध्‍ये सर्वांत मोठे भाऊ होते. ते सर्वाधिक शिकलेले होते. ते आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) होते. ते सर्वांत मोठे असल्‍यामुळे त्‍यांनी लवकर शिक्षण पूर्ण करून घरखर्चाला हातभार लावला. त्‍यांनी बाकी भावांच्‍या शिक्षणालाही साहाय्‍य केले. ते शांत होते. त्‍यांच्‍यामध्‍ये ‘ऐकण्‍याची वृत्ती’ हा फार मोठा गुण होता. आता जसे आपण आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) पहातो, ते येऊन बसल्‍यावर रुग्‍णाला त्‍याचे नाव विचारतात आणि ‘हं सांगा काय होते ?’ तो जे सांगतो, त्‍यावर पटापट २ मिनिटांत औषधे लिहून देतात. अप्‍पाकाका तसे नव्‍हते. ते रुग्‍णाची आधीपासूनची सगळी माहिती (हिस्‍ट्री) घेऊन रुग्‍णाला तपासत असत. त्‍यांनी एम्.बी.बी.एस्., एम्.डी.च्‍या व्‍यतिरिक्‍त आयुर्वेद आणि होमिओपॅथी अन् अन्‍य चिकित्‍सा (अल्‍टरनेटिव मेडिसिन) शिकून घेतल्‍या. ती अन्‍य चिकित्‍सा म्‍हणजे शेवटी आध्‍यात्मिक उन्‍नत स्‍थिती. (जी गोष्‍ट जीवनात कधी पूर्ण होत नसते. त्‍याला एक सीमा असते. सीमेच्‍या पुढे जाऊन ते शोध करत होते.)

८ आ. निरपेक्ष, प्रत्‍येक गोष्‍ट शिस्‍तबद्ध आणि परिपूर्ण पद्धतीने करणारे आणि अध्‍यात्‍मही परिपूर्ण अभ्‍यास करून समाजाला शिकवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

डॉ. विजय आठवले : जयंतकाका (परात्‍पर गुरु डॉक्‍टर) परिपूर्ण असलेले (परफेक्‍शनिस्‍ट) होते आणि प्रत्‍येक काम मग त्‍याला कितीही वेळ लागला, तरी त्‍यात ते चालढकलपणा करत नव्‍हते. ‘कुणीतरी येऊन मला साहाय्‍य करावे’ आणि ‘दुसर्‍याने हे करावे’, अशी त्‍यांनी कधीच अपेक्षा केली नाही. आवश्‍यकता पडल्‍यास ‘मी स्‍वतःच करतो. सर्व जण जाऊन झोपा’, असे त्‍यांचे सांगणे असायचे. रात्री घरी कुणी पाहुणे आले, तर ‘कुणीतरी येऊन त्‍यांचे करत आहे किंवा सर्व जण मिळून करतात’ असे नव्‍हते, तर ते स्‍वतःच त्‍यांचे करत होते. मग कितीही उशीर झाला, तरी चालेल. प्रत्‍येक गोष्‍ट शिस्‍तबद्ध करणे, प्रत्‍येक गोष्‍ट योग्‍य ठिकाणी ठेवणे, ही त्‍यांची वैशिष्‍ट्ये आहेत. जयंतकाका प्रत्‍येक गोष्‍ट अत्‍यंत व्‍यापक स्‍तरावर, लक्षपूर्वक आणि परिपूर्णतेने करत होते. ते नेहमी प्रत्‍येक कृती परिपूर्ण करण्‍यावर विश्‍वास ठेवतात आणि पुढे जाऊन त्‍यांचा हाच सर्वाधिक मोठा गुण असल्‍याचे सिद्ध झाले आहे. त्‍यांनी अध्‍यात्‍मही परिपूर्णतेच्‍या दृष्‍टीने त्‍याचे शास्‍त्रीय (सायंटिफिक) महत्त्व काय आहे ? अध्‍यात्‍म म्‍हणजे काय आहे ? प्रत्‍येक दिवशी त्‍याचा आपल्‍याला कसा लाभ होतो ? अशा प्रकारच्‍या गोष्‍टी सांगून ते प्रत्‍येक स्‍तरावरील व्‍यक्‍तीला प्रभावित करू शकतात आणि आपल्‍याशी जोडून घेऊ शकतात.

८ इ. सुहासकाका शांत आणि मितभाषी होते. मला सर्वांत शांत तेच वाटतात.

८ ई. आनंदी स्‍वभावाचे, महाविद्यालयात शिकवणारे, समाजसेवा आणि अध्‍यात्‍म यांतही कार्य करणारे अन् अहं अल्‍प असणारे विलासकाका ! : विलासकाका कदाचित् सर्वांत अधिक आनंदी स्‍वभावाचे (जॉली नेचर) आहेत आणि त्‍यांना पुष्‍कळ काही ज्ञान आहे, समज आहे. अध्‍यात्‍मासाठी ते जगात पुष्‍कळ फिरलेले आहेत. सर्व भावांमध्‍ये सर्वाधिक फिरणे त्‍यांचे झाले आहे आणि त्‍यांनी विविध प्रकारच्या व्‍यक्‍तींच्‍या समवेत किती तरी प्रकारचे कार्य केले आहे. त्‍यांनी महाविद्यालयातही शिकवले आहे. त्‍यांनी काही काळ उद्योगपतीसह कार्य केले आहे. नंतर ते अध्‍यात्‍मात आले. ते समाजसेवेतही आहेत; परंतु त्‍यांना स्‍वतःला नेहमी लहान होऊन रहाणे आवडते. ती त्‍यांची कदाचित् सर्वांत मोठी गोष्‍ट आहे. ‘मला काही येत नाही’, असे ते म्‍हणतात. जसे परम पूज्‍य म्‍हणतात, ‘मी काय करतो, देव करतो’ असे त्‍यांचे आहे.’

(समाप्‍त)