१२ वर्षे पसार असणार्‍या धर्मांध आरोपीला अटक !

मुंबई पोलिसांची कारवाई !

वसई – संचित रजा घेऊन पसार झालेल्‍या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्‍याला मीरा-भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्‍तालयाच्‍या मध्‍यवर्ती गुन्‍हे शाखेने मीरा रोड येथून अटक केली आहे. तो १२ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. वर्ष २००७ मध्‍ये मुंबईच्‍या अमली पदार्थविरोधी शाखेने नासिरअली खान (वय ५२ वर्षे) या अमली पदार्थ विक्रेत्‍याला अटक केली होती. तो भायखळा येथे रहात होता. त्‍याच्‍यावर अमली पदार्थ बाळगल्‍याप्रकरणी खटला चालू होता. वर्ष २०१० मध्‍ये तो अमली पदार्थ बाळगल्‍याप्रकरणी दोषी आढळल्‍यानंतर १० वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आणि त्‍याची रवानगी नाशिकच्‍या मध्‍यवर्ती कारागृहात करण्‍यात आली होती. ११ फेब्रुवारी २०११ मध्‍ये त्‍याने संचित रजेसाठी (पॅरोल) अर्ज केला होता. त्‍याला ३० दिवसांची संचित रजा संमत झाली; मात्र तेव्‍हापासून तो पसार होता.

संपादकीय भूमिका

एका आरोपीला पकडायला १२ वर्षे लागत असतील, तर पोलीस दाऊदच्‍या मुसक्‍या कधी आवळणार ?