रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘चक्रीवादळ आपत्ती निवारण’ रंगीत तालीम

चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी रंगीत तालीम

रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळे, राजापूर तालुक्यातील आंबोळगड, गुहागर तालुक्यातील वेलदूर, दापोली तालुक्यातील कर्दे आणि मंडणगड तालुक्यातील वाल्मीकिनगर या ५ गावांमध्ये, तसेच जे.एस्. डबल्यु जयगड, गुहागरमधील आर्.जी.पी.पीएल., कोकण एल.एन्.जी. आणि आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स अन् अल्ट्राटेक या बंदरांवर चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी रंगीत तालीम पार पडली.

या वेळी महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रियल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एन्.डी.आर्.एफ्. आदी प्रमुख विभागांनी सज्जता   दाखवली.
चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी होणार्‍या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावर २ वेळा बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. रंगीत तालिमीच्या अनुषंगाने ७ नोव्हेंबरला नियोजन करण्यात आले होते. या दिवशी सकाळी साडेआठ वाजल्यापासून विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले होते.

गावांमधून चेतावणी  देवून सतर्क करणे, आवश्यक साधनसामुग्रीच्या साहाय्याने घायाळांना वाचवणे, घायाळांना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करणे, समुद्रात असणार्‍या व्यक्तींना ‘लाईफ बोट’, ‘लाईफ जॅकेट’, दोरी आदींच्या साहाय्याने वाचवून किनार्‍यावर आणणे आदी प्रात्यक्षिके विविध विभागांनी रंगीत तालिमेत सादर केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुति बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.