चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ने आयोजित केलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली !

ग्रंथप्रदर्शन बघतांना श्री. अर्जुन संपथ, माहिती सांगतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन आणि सौ. सुगंधी जयकुमार

चेन्‍नई – येथील एम्.जी.आर्. नगरमधील सेल्‍वा महालमध्‍ये ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’च्‍या (हिंदु जनता पक्षाच्‍या) वतीने आयोजित करण्‍यात आलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडली. ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’चे नेते श्री. अर्जुन संपथ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या धर्मजागृती सभेसाठी हिंदु जनजागृती समितीलाही निमंत्रित करण्‍यात आले होते. सभेच्‍या प्रारंभी श्री. अर्जुन संपथ आणि इतर निमंत्रित पाहुणे यांनी ‘सेंगोल’ची (धर्मदंडाची) पूजा केली. त्‍यानंतर ५० हून अधिक सुवासिनींनी दीपपूजन आणि देवीची पूजा केली. या वेळी पुरोहितांनी ‘ललिता सहस्रनामावली’चे पठण केले. तत्‍पूर्वी समितीच्‍या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी देवीच्‍या पूजेचे महत्त्व, कुंकुमार्चन आणि कुलदेवतेचे नामस्‍मण यांविषयीची माहिती थोडक्‍यात विशद केली. याप्रसंगी श्री. अर्जुन संपथ आणि इतर प्रतिष्‍ठित यांच्‍या हस्‍ते ‘भारतमाता पीपल्‍स ट्रस्‍ट’ नावाच्‍या नवीन संघटनेचे उद़्‍घाटन करण्‍यात आले. त्‍यानंतर श्री. अर्जुन संपथ यांनी पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांच्‍या उपस्‍थितीत तमिळ भाषेतील ‘सनातन पंचांग २०२४’चे प्रकाशन केले.

या कार्यक्रमाच्‍या दुसर्‍या सत्रात श्री. अर्जुन संपथ यांच्‍या नेतृत्‍वाखाली एक पत्रकार परिषद घेण्‍यात आली. या वेळी श्री. संपथ यांनी हलाल अर्थव्‍यवस्‍था आणि त्‍याचा समाजावर होणारा विपरीत परिणाम यांविषयी विस्‍तृत माहिती सांगितली. श्री. संपथ यांनी ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ या तमिळ भाषेतील ग्रंथाच्‍या प्रती विकत घेऊन त्‍या निमंत्रित पाहुणे आणि कार्यकर्ते यांना वाटल्‍या. या कार्यक्रमाला धर्मप्रेमी महिलांसह एकूण १५० जण उपस्‍थित होते.

क्षणचित्रे

१. ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’चे तिरुवरूर येथील कार्यकर्ते श्री. पी. जयरामन् यांनी समितीने लावलेल्‍या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली आणि तिरुवरूर येथे होणार्‍या एका कार्यक्रमासाठी काही लघुग्रंथ घेण्‍याची सिद्धता दर्शवली.

२. धर्माभिमानी तथा उद्योजक श्री. प्रवीण चंद यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली .

३. या कार्यक्रमाला एक विशेष अतिथी म्‍हणून उपस्‍थित असलेले वरिष्‍ठ पत्रकार श्री. प्रभाकरन् यांनी ‘हलाल’च्‍या दुष्‍परिणामाविषयी सर्वत्र प्रसार करणार असल्‍याचे सांगितले. तसेच त्‍यांनी ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ या ग्रंथाविषयी पुनरावलोकन लिहिणार आहे’, असे  सांगितले.