जाळपोळ करणार्‍यांवरील गुन्‍हे मागे घेण्‍याचा मनोज जरांगे यांचा आग्रह का ? – मंत्री छगन भुजबळ

सरसकट कुणबीमुळे ओबीसी आरक्षण धोक्‍यात !

मंत्री छगन भुजबळ

छत्रपती संभाजीनगर – ‘मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी घरे जाळणारे आणि दगडफेक करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते नाहीत’, असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत. मग आंदोलनात गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी जरांगे यांचा आग्रह कशासाठी आहे ? असा प्रश्‍न राज्‍याचे मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्‍थित केला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्‍ये समावेश केल्‍यास भविष्‍यात इतर मागासवर्गांचे आरक्षण संपणार आहे, अशी भीतीही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. आंदोलनात ज्‍यांची घरे जळली आहेत, त्‍यांना आर्थिक साहाय्‍य करावे, अशी मागणी त्‍यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी झालेल्‍या आंदोलनात बीड येथे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्‍यांच्‍या कुटुंबाचे कार्यालय जाळण्‍यात आले. माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके आणि समता परिषद तथा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुभाष राऊत यांचे उपाहारगृह जाळण्‍यात आले. यांची पहाणी मंत्री भुजबळ यांनी केली. त्‍यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ म्‍हणाले की,

१. जरांगे यांच्‍या उपोषणावर लाठीमार करण्‍यापूर्वी ७० पोलीस अधिकारी-कर्मचारी घायाळ झाले आहेत. याची सखोल चौकशी होणे आवश्‍यक आहे. अंतरवाली सराटी येथे पोचल्‍यानंतर तात्‍काळ पोलिसांनी लाठीमार केला नाही.

२. तत्‍पूर्वी काहीतरी घडले असणार आहे. आयोगातील न्‍यायमूर्ती उपोषणस्‍थळी जाऊन हात जोडून ‘सर-सर’ करतात. न्‍यायमूर्तींनी आपले काम करावे. उपोषणकर्त्‍याला हात जोडून उपोषण मागे घ्‍यायला लावण्‍याचे काम त्‍यांचे नाही.

३. इतर मागासवर्गात २३० जाती होत्‍या. आज ३७५ इतकी संख्‍या झाली आहे. मराठा समाज यामध्‍ये आल्‍यास ओबीसी आरक्षण संपुष्‍टात येईल.

४. कुणबी समाजाच्‍या २ दिवसांत ११ सहस्र नोंदी कशा काय सापडतात ? जातनिहाय जनगणना झाल्‍यास ५६ टक्‍क्‍यांहून अधिक ओबीसी असल्‍याचे सिद्ध होईल.