धाडस असेल, तर श्रीरामचरितमानसवर चर्चा करावी ! – श्री रामभद्राचार्य

श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !

श्री रामभद्राचार्य व प्रा. चंद्रशेखर

बगहा (बिहार) – बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी येथे येऊन श्रीरामचरितमानसवर चर्चा करावी. जर त्यात काही विसंगती आढळली, तर मी पाटलीपुत्र येथे गंगानदीमध्ये समाधी घेईन अन्यथा चंद्रशेखर यांना राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान श्री रामभद्राचार्य यांनी त्यांना दिले. ते बगहा येथील रामनगरात तिसर्‍या दिवशीच्या प्रवचनात बोलत होते. शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ असल्याचा दावा केला होता. (जिहादी आतंकवादी कोणत्या विचारसरणीमुळे बनतात, त्याविषयी चंद्रशेखर कधीही तोंड उघडणार नाहीत; कारण तसे केले, तर थेट ‘सर तन से जुदा’चा (शिर धडापासून वेगळे करणे) फतवा निघतो, हे त्यांना ठाऊक असते ! – संपादक)

सौजन्य: News18 Bihar Jharkhand

१. श्री रामभद्राचार्य पुढे म्हणाले की, चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे की, श्रीरामचरितमानसमध्ये विसंगती आहे. जर त्यांना त्यांच्या आईने प्रामाणिकपणाचे दूध पाजले असेल, तर त्यांनी श्रीरामचरितमानसवर चर्चा करावी.

२. प्रवचनाच्या वेळी श्री रामभद्राचार्य यांनी बिहारमधील जात जनगणनेवरूनही नीतीश कुमार सरकारवर टीका केली. ते म्हमाले की, श्रीरामचरितमानसमध्ये जातीयवादाचा उल्लेख असल्याचे बिहार सरकारचे मंत्री सांगत आहेत; मात्र दुसरीकडे त्यांचेच सरकार जात जनगणना करून बिहारचे विभाजन करण्याचे काम करत आहे. (हे आहे हिंदुद्वेषी राजकारण्यांचे खरे स्वरूप ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेषाची कावीळ झालेले लोक कधीही हिंदु धर्म किंवा धर्मग्रंथ यांवर चर्चा करत नाहीत; कारण त्यांनी याचा अभ्यास न करता टीका केलेली असते आणि हे वास्तव उघडे पडणार असल्याने ते अशा आव्हानांपासून पलायन करतात !