डोंबिवली येथे उद़्‍घाटनाच्‍या ९ मासांनंतरही अभ्‍यासिका बंदच !

इतका वेळकाढूपणा का केला जात आहे ?


डोंबिवली – येथील पश्‍चिम रेल्‍वेस्‍थानकालगत डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्‍या पहिल्‍या माळ्‍यावर कल्‍याण-डोंबिवली पालिकेने ४० लाख रुपये खर्च करून गेल्‍या वर्षी १५० विद्यार्थी क्षमतेची वातानुकूलित अभ्‍यासिका सिद्ध केली आहे. या अभ्‍यासिकेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्‍या हस्‍ते उद़्‍घाटन करण्‍यात आले. उद़्‍घाटन होऊन ९ मास उलटूनही पालिकेकडून अभ्‍यासिका डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाकडे हस्‍तांतरित होत नाही किंवा ती चालू करण्‍यात येत नाही.

ग्रंथसंग्रहालयाच्‍या दुसर्‍या माळ्‍यावरील ४० क्षमतेच्‍या अभ्‍यासिकेत विद्यार्थी सकाळी ९.३० ते सायंकाळी ७.३० यावेळेत दाटीवाटीने बसतात. काही विद्यार्थी बाहेरील मोकळ्‍या जागेत बसतात. दरमहा १५० रुपये शुल्‍क असल्‍याने मुंबई, ठाणे परिसरात शिक्षण घेणारे बदलापूर, टिटवाळा, कल्‍याण, दिवा, डोंबिवली, २७ गावभागांतील विद्यार्थी अभ्‍यासिकेत येतात. ‘नवीन अभ्‍यासिका पालिकेने लवकर चालू करावी’, अशी मागणी विद्यार्थ्‍यांनी केली आहे. पालिकेचे आयुक्‍त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ‘अभ्‍यासिका लवकरच चालू करण्‍यात येईल’, असे आश्‍वासन दिले आहे.