मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्यपालांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशी चर्चा करावी ! – विरोधी पक्षांतील नेत्यांची मागणी

विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांची घेतली भेट !

नेत्यांनी राज्यपालांची घेतली भेट

मुंबई – महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमैश बैस यांची भेट घेऊन ‘राज्यपालांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रकरणी मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशी चर्चा करावी’, अशी मागणी केली. या वेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभु यांच्यासह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे आमदार उपस्थित होते.

‘मराठा समाजात असंतोषाची भावना आणि उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठा समाज आत्महत्या करत आहे. जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावलेली आहे. अघटित घडू नये, यासाठी मध्यस्थी करून प्रश्‍न सोडवा. सरकार सकारात्मक तोडगा काढणार असेल, तर आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करू. हे सरकार एकमेकांवर ढकलत आहे. सरकारमधील पक्षांनी सामूहिक दायित्व घ्यावे’, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.