आत्‍महत्‍येस भाग पाडणार्‍यांच्‍या हत्‍येसाठी मागेपुढे बघू नका !

शेतकरी नेते तुपकर यांचे शेतकर्‍यांना चिथावणीखोर आवाहन !

रविकांत तूपकर

नागपूर – सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणामुळे अजूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्‍महत्‍या करत आहेत. शेतमालाला भावच मिळत नाही. त्‍यातही अस्‍मानी संकट ठेवलेलेच आहे. अशा परिस्‍थितीत शेतकरी आत्‍मघातकी निर्णय घेतात; पण आता असे करून चालणार नाही. ज्‍यांनी तुम्‍हाला आत्‍महत्‍या करण्‍यास भाग पाडले आहे, आता त्‍यांच्‍या हत्‍या करण्‍यासही मागेपुढे बघू नका, असे चिथावणी देणारे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी येथे २५ ऑक्‍टोबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले.

ते म्‍हणाले की, ब्रिटीश सरकारला जागे करण्‍यासाठी आणि जनतेचा आवाज त्‍यांच्‍यापर्यंत पोचवण्‍यासाठी क्रांतीकारी हुतात्‍मा भगतसिंग आणि त्‍यांचे साथीदार यांनी ब्रिटीश संसदेत मोठा स्‍फोट घडवला होता. शेतकर्‍यांच्‍या सूत्रावर आंधळ्‍या आणि बहिर्‍या झालेल्‍या सरकारला जागे करण्‍यासाठी आता अशाच मोठ्या स्‍फोटाची आवश्‍यकता आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन, संत्री, धान पिकवणार्‍या अनेक शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढवले आहे. सातत्‍याने या विषयावर सरकारशी बोलणे चालू होते; परंतु आतापर्यंत कोणत्‍याही सरकारने शेतकर्‍यांच्‍या सूत्राविषयी हिताचे निर्णय घेतलेले नाहीत.