भरतपूर (राजस्थान) येथे भूमीच्या वादातून एका व्यक्तीची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या !

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या शरिरावरून ८ वेळा फिरवला ट्रॅक्टर !

भरतपूर (राजस्थान) – येथे भूमीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्यात आले. आरोपींनी या व्यक्तीवरून ८ वेळा ट्रॅक्टर मागे-पुढे फिरवत तिची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या वादातून झालेल्या हिंसाचारात १२ जण घायाळही झाली आहेत.

बहादुर सिंह गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर यांच्या कुटुंबामध्ये भूमीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद चालू होता. ३ दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडणही झाले होते. त्या वेळी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी २२ जणांना पकडले होते. २५ ऑक्टोबरच्या दिवशी बहादुर सिंह गुर्जर यांची लोक वादग्रस्त भूमीवर ट्रॅक्टर घेऊन पोचले आणि भूमी नांगरू लागले. याची माहिती अतर सिंह गुर्जर यांना मिळाल्यावर ते तेथे पोचले आणि भांडण चालू झाले. या वेळी ४५ वर्षीय नरपत सिंह गुर्जर हे ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांच्यावर ट्रॅक्टर चढवून त्यांना ठार करण्यात आले. या घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने गावकरी तेथे उपस्थित होते. त्यांच्यापैकी कुणीही भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट गावकर्‍यांनी या घटनेचे भ्रमणभाषवरून चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला. (अशा असंवेदनशील जनतेवर भविष्यात मोठे संकट आले, तर ती कधीतरी संघटित होऊन त्यापासून स्वतःचे रक्षण करू शकेल का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या राज्यात उघडपणे होणार्‍या अशा घटना तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दर्शवतात !