रत्नागिरी मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्यास प्रारंभ

मिरकरवाडा बंदर

रत्नागिरी – तालुक्यातील मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम १७ ऑक्टोबर या दिवशी चालू करण्यात आले. मत्स्य विकास विभाग, पोलीसदल आणि नगर परिषद यांच्याकडून अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत.

मिरकरवाडा बंदरात मत्स्य व्यवसाय विभागाच्या मालकीच्या जागेत ३०३ झोपड्यांचे शेडसह पक्के बांधकाम करण्यात आलेले आहे. तत्कालीन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर राजम यांनी बंदरावरील अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना १६ ऑक्टोबरपर्यंत हे बांधकाम  हटवण्याची नोटीस पाठवली होती. तरीही दिलेल्या मुदतीत या सर्व अनधिकृत झोपड्या, शेड, पक्की बांधकामे हटवली नव्हती.

यानंतर मात्र १७ ऑक्टोबर या दिवशी ही अनधिकृत बांधकामे तोडण्यास प्रारंभ करण्यात आला. या वेळी स्थानिकांनी प्रशासनाच्या या कृतीस विरोध केला; मात्र प्रशासनाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम चालूच ठेवले.