पू. (सौ.) मालिनी देसाई आणि पू. सीताराम देसाई यांची छायाचित्रे काढतांना अडचणी आल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने लक्षात आलेली सूत्रे !

आज भाद्रपद कृष्‍ण अष्‍टमी (७.१०.२०२३) या दिवशी सनातनच्‍या ५२ व्‍या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांचा ७७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

पू. (सौ.) मालिनी देसाईआजी यांच्‍या ७७ व्‍या वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

पू. (सौ.) मालिनी देसाई

१. पू. (सौ.) मालिनी देसाईआजी (वय ७७ वर्षे) आणि पू. सीताराम देसाईआजोबा (वय ८२ वर्षे) यांची छायाचित्रे काढतांना अडचणी येणे

‘५.३.२०२३ या दिवशी पू. (सौ.) मालिनी देसाईआजी आणि पू. सीताराम देसाईआजोबा यांची छायाचित्रे काढायची होती. त्‍यांची छायाचित्रे काढतांना पुष्‍कळ अडचणी येत होत्‍या. त्‍यांची छायाचित्रे चांगली येत नव्‍हती. पू. आजींची साडी व्‍यवस्‍थित नेसली जात नव्‍हती. अनुमाने ३० ते ४५ मिनिटांनंतर पू. आजींची चांगली छायाचित्रे निघाली. पू. आजोबांची छायाचित्रे काढतांनाही अडचणी आल्‍या.

पू. सीताराम देसाई

२. ‘छायाचित्रे काढतांना अनिष्‍ट शक्‍तींनी अडथळे आणले’, असे पू. (सौ.) देसाईआजींनी सांगणे

छायाचित्रे काढून झाल्‍यावर पू. (सौ.) देसाईआजी म्‍हणाल्‍या, ‘‘देवाच्‍या कृपेनेच छायाचित्रे निघाली. प्रत्‍येक गोष्‍टीत अनिष्‍ट शक्‍ती अडथळे आणतात. अन्‍य वेळी आम्‍ही व्‍यवस्‍थित हसू शकतो; पण आता आम्‍ही हसत असतांनाचे छायाचित्र नीट येत नाही. असे होण्‍याचे कारण म्‍हणजे अनिष्‍ट शक्‍तींनी आणलेला अडथळा आहे.’’

३. पू. (सौ.) देसाईआजींचे बोलणे ऐकून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया

पू. आजींनी वरील सूत्र सांगितल्‍यावर माझ्‍या मनात विचार आले,

३ अ. ‘संतांची छायाचित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून आल्‍यावर चैतन्‍याचा प्रवाह कार्यरत होऊन समष्‍टीला अधिक प्रमाणात चैतन्‍याच्‍या स्‍तरावर लाभ होत असल्‍याने त्‍याला विरोध म्‍हणून अनिष्‍ट शक्‍ती अडथळे आणत असावेत’, असे वाटणे : ‘संतांची छायाचित्रे काढणे, ही अधिकाधिक २० ते ३० मिनिटांची कृती आहे. त्‍यातही अनिष्‍ट शक्‍ती अडथळे आणतात. याचा अर्थ असा की, जेव्‍हा संतांची छायाचित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून येतात, त्‍यापूर्वी काही साधकांकडून ती पडताळली जातात. तेव्‍हा कितीतरी अधिक पटींनी चैतन्‍याचा प्रवाह कार्यरत होऊन समष्‍टीला अधिक प्रमाणात चैतन्‍याच्‍या स्‍तरावर लाभ होतो. याला विरोध म्‍हणूनच अनिष्‍ट शक्‍ती त्‍यात अडथळे आणतात.’

३ आ. माझ्‍या मनात हे विचार आल्‍यावर ‘गुरूंनी सांगितलेल्‍या प्रत्‍येक कृतीमागे कसा समष्‍टीचा विचार असतो’, हे माझ्‍या लक्षात आले.

३ इ. तेव्‍हा मला वाटले, ‘गुरूंनी करायला सांगितलेल्‍या प्रत्‍येक कृतीला महत्त्व आहे. आपल्‍याकडून ती सेवा किंवा कृती गुरुदेवांना अपेक्षित आणि निर्विघ्‍नपणे व्‍हायला हवी.’

कु. सायली देशपांडे

४. सेवा निर्विघ्‍नपणे आणि गुरूंना अपेक्षित अशी होण्‍यासाठी गुरूंच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने सुचलेली सूत्रे !

तेव्‍हा गुरूंनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सूक्ष्मातून सांगितले, ‘आपण करत असलेली सेवा निर्विघ्‍नपणे आणि गुरूंना अपेक्षित अशी होण्‍यासाठी सेवा चालू करण्‍यापूर्वी प्रार्थना करावी. आपण करत असलेल्‍या सेवेभोवती सूक्ष्मातून श्रीकृष्‍णाच्‍या नामजपाचे मंडल घालून संरक्षककवच निर्माण होण्‍यासाठी प्रार्थना करावी. सेवा करत असतांना सेवेत गुरूंचे साहाय्‍य घ्‍यावे, म्‍हणजेच प्रत्‍येक कृती त्‍यांना सांगून करावी. ‘स्‍वतःचा विचार न करता संपूर्ण समर्पणभावाने सेवा कशी होईल ?’, याकडे लक्ष द्यावे.’

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘श्री गुरूंच्‍याच अपार कृपेमुळे गुरूंनी दिलेल्‍या सेवांचे अनन्‍यसाधारण महत्त्व माझ्‍या लक्षात आले’, त्‍याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, तुम्‍ही दिलेल्‍या शिकवणीप्रमाणे तुम्‍हीच माझ्‍याकडून प्रयत्न करून घ्‍या’, अशी प्रार्थना आहे.’

– गुरुचरणसेविका,

कु. सायली देशपांडे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक