पंडित नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच इंग्लंडचा राष्ट्रध्वज खाली उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, वरिष्ठ पत्रकार

नेहरूंचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे, ही भारतियांची फसवणूक असल्याचे प्रतिपादन !

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

नेहरूंना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचा संदेश इंग्लंडहून आला !

काँग्रेसचे पहिले ५ अध्यक्ष हे विदेशी होते. विदेशींनीच काँग्रेसला जन्म दिला. वर्ष १९४६ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी एकूण १५ पैकी १२ मते सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळाली, तर ३ मते रहित झाली. नेहरू यांना एकही मत नसतांना केवळ गांधीजी यांच्या दबावामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंना उमेदवार म्हणून घेण्यात आले. नेहरू यांना काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचा निरोप इंग्लंड येथूनच आला होता, असे विधान या वेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.

मुंबई, १ ऑक्टोबर (वार्ता.) – २८ एप्रिल १९४८ या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बंगालचे गव्हर्नर जनरल गोपाळचार्य यांना ‘भारताचे गव्हर्नर जनरल’ करण्यासाठी इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान ॲटली यांच्याकडे अनुमती घेण्यासाठी पत्र पाठवले. या पत्रावर नेहरू यांची ‘भारताचे पंतप्रधान’ म्हणून स्वाक्षरी आहे. भारत स्वतंत्र होता, तर गव्हर्नरच्या नियुक्तीसाठी नेहरूंनी इंग्लंडची अनुमती का घेतली ? कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झालाच नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच ‘युनियन जॅक’ खाली (इंग्लंडचा राष्ट्रध्वज) उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, असे विधान सुप्रसिद्ध वक्ते आणि वरिष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. ३० सप्टेंबर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ‘मंदिर संस्कृति रक्षण’ सभेत कुलश्रेष्ठ बोलत होते.

या वेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, ‘‘पुस्तकांमध्ये नेहरू यांना मोठे करण्यात आले. ‘नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करावा’, असे त्यांचे एकही काम नाही. नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे ही, भारतियांची फसवणूक आहे. गुरुगोविंदसिंह यांच्या मुलांना भिंतीमध्ये जिवंत पुरले; परंतु त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. असे शौर्य दाखवणारा दिवस खरा ‘बालदिन’ म्हणून साजरा व्हायला हवा. सुभाषचंद्र बोस यांनी वर्ष १९४३ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ९ देशांनी त्यांना पाठिंबा दिला. ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पंतप्रधान करण्याऐवजी इंग्लंडची चाटूगिरी करणाऱ्याला नेहरू यांना पंतप्रधान करण्यात आले.’’

संपादकीय भूमिका

भारतीय स्वातंत्र्याचा योग्य इतिहास युवा पिढीपर्यंत पोचण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत !