अफगाणिस्तानकडून भारतातील दूतावास बंद

नवी देहली – अफगाणिस्तानने १ ऑक्टोबरपासून भारतातील त्याचा दूतावास बंद केला आहे. अफगाणिस्तानने निवेदनात म्हटले आहे की, भारतासमवेतचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय सूत्रांवरील वेगवेगळ्या भागीदार्‍या पहाता हा निर्णय क्लेशदायक असला, तरी आम्ही तो अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे. एकीकडे भारताकडून आम्हाला पुरेसे समर्थन मिळत नाही आणि दुसर्‍या बाजूला अफगाणिस्तानमध्ये वैध सरकारही नाही. त्यामुळेच आम्ही या निर्णयापर्यंत पोचलो आहोत. ‘दूतावास स्थलांतरित होईपर्यंत दूतावासाच्या भारतातील वाणिज्य सेवा चालू रहातील’, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.

सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतरही तेथील आधीच्या सरकारचा भारतातील दूतावास चालू होता; मात्र त्याच वेळी ‘भारतातील त्यांचा अधिकृत राजदूत कोण ?’, हे स्पष्ट झाले नव्हते. या दूतावासातील राजदूत आणि इतर अधिकारी यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिका येथे आश्रय घेतला आहे.