ठाणे येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला ‘शेतकरी संवाद यात्रे’ला भगवा झेंडा ! 

ठाणे, २९ सप्‍टेंबर (वार्ता.) – शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्‍या वतीने राज्‍यभरात चालू होणार्‍या ‘शेतकरी संवाद यात्रे’चा शुभारंभ येथील टेंभी नाका येथे करण्‍यात आला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला.

यात्रेच्‍या माध्‍यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्‍यक्ष शेतकर्‍यांच्‍या बांधावर जाऊन त्‍यांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत. त्‍यातील काही प्रश्‍नांचे जागच्‍या जागी निराकरण करण्‍यात येईल. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास मुख्‍यमंत्री स्‍वतः ऑनलाईन माध्‍यमाद्वारे संबंधित शेतकर्‍यांशी थेट संवाद साधून त्‍याचे प्रश्‍न तातडीने सोडवण्‍यासाठी पुढाकार घेणार आहेत. शेतकर्‍यांना भेडसावणारे प्रश्‍न समजून घेणे, शेतकर्‍यांसाठी असलेल्‍या विविध शासकीय योजनांची त्‍यांना थेट माहिती देणे, तसेच त्‍या योजनांचे लाभ मिळवून देणे अशा दृष्‍टीने प्रयत्न केले जाणार आहेत.