नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !

नेरूळ (नवी मुंबई) – येथील एका महिलेने गणेशोत्सवात १० दिवस श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे बौद्ध समाजातील काही लोक तिला विरोध करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ही महिला ‘मुलीच्या आनंदासाठी श्री गणेशमूर्तीची स्थापना केली’, असे पुनःपुन्हा सांगतांना दिसत आहे. ही महिला निडरपणे विरोध करण्यासाठी आलेल्या लोकांना ‘तुम्ही कुणावरही बळजोरी करू शकत नाही. आम्ही सगळे देव-धर्म मानतो. आधीची पिढी तशीच होती. पालट करणे आपले काम आहे ना ? पालट एकामुळे होत नाही, सगळीकडून व्हायला पाहिजे. आम्ही गावाला कार्यक्रम करू.’’ असे उलट सांगते.

१. प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये विरोध करणारे त्या महिलेशी बराच वेळ वाद घालतात रहातात; परंतु शेवटपर्यंत महिला तिच्या भूमिकेवर ठाम रहाते आणि विरोध करणार्‍यांना दाद देत नाही. शेवटी विरोध करणारे या महिलेला चेतावणी देऊन निघून जातात.

२. भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर नारायण साळवे यांनी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ फेसबुकवरून प्रसारित करून महिलेला विरोध करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

३. वरील व्हिडिओवरून सामाजिक माध्यमांवर २ गट पडले असून अनेकांनी त्या महिलेचे कौतुक केले असून तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी  त्या महिलेला विरोध केला आहे.

४. श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्यावरून काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनाही विरोध झाला होता.

संपादकीय भूमिका

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे  अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?