रिक्शाचालकाकडून अपहरण करून महिलेवर अतीप्रसंगाचा प्रयत्न !

आरोपींना पकडतांना २ पोलीस घायाळ

असुरक्षित ठाणे शहर !

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – येथील शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथील एक महिला रिक्शाने येत होती. रिक्शाचालक प्रभाक पाटील (वय २२ वर्षे) आणि वैभव राजेश तरे (वय १९ वर्षे) यांनी महिलेला इच्छित स्थळी न सोडता ८ सप्टेंबरच्या रात्री १०.४५ वाजता तिचे अपहरण केले. तिला कोळेगावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन हत्याराचा धाक दाखवत तिच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गस्तीवर असलेले मानपाडा पोलीस ठाणे येथील हवालदार सुधीर हसे आणि अतुल भोई यांच्या सतर्कतेमुळे महिलेची आरोपींच्या तावडीतून सुटका झाली. (प्रसंगावधान दाखवत आरोपींच्या तावडीतून महिलेची सुटका करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! – संपादक) आरोपींनी पोलिसांवर केलेल्या आक्रमणात २ पोलीस घायाळ झाले आहेत. (आक्रमणात पोलीसच घायाळ हाेतात, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक) सराईत गुन्हेगार आरोपींच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.