रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उदयनिधी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – केंद्र सरकारने ज्या योजना आणल्या आहेत, तसेच जी कामे केली आहेत, त्या सर्व ‘सनातन’ शब्दाचा वापर करून अपकीर्त करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र जे विरोध करणारे विसरले आहेत की, रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांनी केलेले अत्याचार यांनंतरही सनातन संपला नाही. अशात असले तुच्छ लोक काय सनातन संपवणार ?, अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उदयनिधी यांच्यावर टीका केली.

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न !

योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात; मात्र त्यांना हे कळत नाही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तरीही ती थुंकी स्वतःच्याच तोंडावर येऊन पडते. रावण, हिरण्यकश्यपू, कंस यांसारख्या राक्षसांनी ईश्‍वराच्या सत्तेला आव्हान दिले होते, त्या सगळ्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती. सनातन धर्म कधीही नष्ट न होणारे सत्य आहे. ही देवाचीच कृपा आहे की, सनातन धर्माला जेव्हा उभारी मिळत आहे, त्याच काळात अयोध्येत श्रीराममंदिर उभे रहाते आहे.