मनोज जरांगे यांच्‍याशी चर्चा अयशस्‍वी, जरांगे यांनी पुन्‍हा दिली ४ दिवसांची मुदत !

जालना – मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्‍यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्‍या ८ दिवसांपासून चालू असलेल्‍या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्‍यात सरकारला ५ सप्‍टेंबर या दिवशी अपयश आले आहे. मागण्‍यांवर तोडगा काढण्‍यासाठी मनोज जरांगे यांनी सरकार सकारात्‍मक निर्णय घेत असल्‍याने पुन्‍हा ४ दिवसांची मुदत दिली आहे. आंदोलक बेमुदत उपोषणावर ठाम आहेत.

भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसह ३ मंत्र्यांनी सलग दुसर्‍या दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अर्धा घंटा चर्चा केली. ‘१ मासाची मुदत द्या. त्‍यात ठोस निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत उपोषण मागे घ्‍या’, अशी विनंती महाजन यांनी केली; पण जरांगे स्‍वतःच्‍या भूमिकेवर ठाम होते. ‘हवे तर आणखी ४ दिवसांची मुदत देतो; पण अध्‍यादेश घेऊनच या’, असे त्‍यांनी सांगितले.