राज्यघटनेत पालट करून देशाचे ‘भारत’ असे नामकरण करा !

भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांची मागणी !

भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव

नवी देहली – भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.

हरनाथ सिंह यादव यांनी मांडलेली सूत्रे

१. संपूर्ण देशाला हा पालट हवा आहे. कानाकोपर्‍यांतून ही मागणी करण्यात येत आहे. सरसंघचालकांनीही ‘भारत’ शब्द वापरण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, जनतेने ‘भारत’ हा शब्द वापरला पाहिजे. ‘भारत’ हा शब्द आपल्याला ऊर्जा देतो, तशी ऊर्जा ‘इंडिया’ नावातून मिळत नाही.’

२. जर ‘सिंध’ ‘इंडिया’ झाला, तर इंडोनेशियामध्ये सिंध नदी कुठे होती ? ‘अँग्लो-इंडियन’ ज्या भागात रहात होते, त्या भागात सिंधु नदी कुठे होती ? असे अनेक देश आहेत जिथे ‘इंड’ हा शब्द आह. तेथे कुठे सिंधु नदी होती ?

३. भारत हा शब्द आपली सांस्कृतिक पार्श्‍वभूमी, सांस्कृतिक संपत्ती, सांस्कृतिक अस्मिता यांचे प्रतीक आहेे. त्यामुळे ‘भारत’ हा शब्द वापरायला हवा. ‘गुलामगिरीची प्रतीके भारताच्या भूमीतून नकोत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले आहे.

४. वेदांतील एका श्‍लोकाचा संदर्भ देत यादव म्हणाले की, महासागराच्या उत्तरेला हिमालय आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला ‘भारत’ म्हणतात. येथील लोकांना ‘भारतीय’ म्हणतात. त्यामुळे ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरावा.

‘इंडिया’ हा शब्द आपल्याला इंग्रजांनी दिलेली शिवी ! – यादव

यादव म्हणाले की, इंग्रजीतील ‘इंडिया’ हा शब्द इंग्रजांच्या दृष्टीने आपण अशिक्षित समुदाय असल्याने त्यांनी भारताचे ‘इंडिया’ असे नामकरण केले; पण आपल्या देशात अशा विकृत मानसिकतेचे लोक आहेत, जे जनतेची दिशाभूल करतात की, ‘इंग्रज सिंधमधून आले होते, त्यांना ‘सिंध’ हा शब्द म्हणता येत नव्हता, ते ‘इंद’ असे म्हणत असत आणि पुढे हळूहळू या ‘इंद’चे ‘इंडिया’ बनले.’ ‘इंडिया’ हा शब्द आपल्याला इंग्रजांनी दिलेली शिवी आहे, त्यामुळे ‘इंडिया’ हा शब्द हटवलाच पाहिजे.

संपादकीय भूमिका

‘राज्यघटनेत पालट करतांना ‘भारत’ नावासह देशाला ‘हिंदु राष्ट्र’ही घोषित करा’, अशी मागणी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी संघटितपणे करावी ! यामुळे सनातन धर्माच्या विरोधात बोलण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !