‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताने सूर्य मोहिमेच्या अंतर्गत प्रक्षेपित केलेल्या ‘आदित्य एल्-१’ यानाच्या निर्मितीमागील काही माहिती आता समोर येत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हे यान बनवण्यात येत होते, त्या ठिकाणी त्यांना अत्तर लावून जाण्यासह अनेक बंधने घालण्यात आली होती; कारण अत्यंत सूक्ष्म कणांचा परिणाम यानाच्या उपकरणांवर होण्याची शक्यता होती. या ठिकाणाची स्वच्छता रुग्णालयातील अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पटींनी अधिक ठेवावी लागते. येथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणे शास्त्रज्ञांच्या सर्व श्रमावर पाणी ओतण्यासारखे असते.

येथील तंत्रज्ञान पथकाचे प्रमुख नागाबुशाना यांनी सांगितले की, या ठिकाणी काम करण्यासाठी विशेष प्रकारचा सुट (पेहराव) घालावा लागतो. यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण पोचू शकत नाही. पथकातील प्रत्येकाला या ठिकाणी येण्यापूर्वी ‘अल्ट्रासोनिक क्लिनिंग  प्रोसेस’ (सूक्ष्मस्तरावरील स्वच्छता प्रक्रिया) पूर्ण करून यावे लागत होते.

संपादकीय भूमिका

सत्त्व, रज आणि तम यांचे कण अत्यंत सूक्ष्म असतात आणि ते ७ भिंतींच्याही पार होतात. या कणांपर्यंत विज्ञान अद्याप पोचलेले नाही; मात्र प्रदूषण करणारे कण त्यांच्या लक्षात आले आहेत आणि ते त्यासाठी विविध प्रकारची खबरदारी घेतात. रज आणि तम यांच्या संदर्भात प्रदूषण रोखण्याविषयी धर्मशास्त्रांत  धार्मिक कृती सांगितलेल्या आहेत. निधर्मीवादी मात्र अशा कृतींना विरोध करतात, हे लक्षात घ्या !