नाशिक येथे २ ठिकाणच्या धाडीत ५९ सहस्र रुपयांचा भेसळीचा माल जप्त !

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

नाशिक – येथील अन्न आणि औषध प्रशासनाने १ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी धाडी घातल्या. भेसळीच्या संशयावरून ५९ सहस्र ४५० रुपयांचे २२४ किलोग्रॅमचे पनीर आणि मिठाई यांचा साठा जप्त करून नष्ट केला. देवळाली कँप परिसरात पेढीच्या पडताळणीत अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा आणि पेढी विनापरवाना पनीर उत्पादन करत असल्याचे दिसले. स्वीट उत्पादक पेढीची पडताळणी केली असता तेथेही विनापरवाना अत्यंत अस्वच्छ वातावरणात पेढा आणि अंजीर बर्फी मिठाईचा साठा आढळला.

संपादकीय भूमिका

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्‍यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !