सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ रुग्णाईत असल्याचे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच असणे

संत आणि साधक यांची सर्वतोपरी काळजी घेणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाच्या स्वप्नात येऊन सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे

‘१९.५.२०२३ या दिवशी तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे माझी प्राणशक्ती पुष्कळ अल्प झाली होती. त्यामुळे मी रामनाथी आश्रमातील एका खोलीत सकाळपासून झोपलो होतो. दुपारी ३ वाजता मला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये मी प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) समोर बसलो होतो. माझ्या समवेत अन्य काही साधकही तेथे उपस्थित होते. त्या वेळी प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘पू. गाडगीळकाका आता कसे आहेत ?’ प.पू. डॉक्टरांनी अकस्मात् हा प्रश्‍न विचारल्यावर मी गोंधळून गेलो आणि म्हणालो, ‘बरे आहेत.’ त्यावर ते म्हणाले, ‘मग त्यांना परत परत ताप का येतो ? आताही त्यांना ताप आहे.’ मी ‘याविषयी मला काही ठाऊक नाही’, असे त्यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘त्यांना आता ताप आहे. तू इथून गेलास की, जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी कर.’

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांची विचारपूस केल्यावर ते रुग्णाईत असल्याचे कळणे आणि त्यांना औषध दिल्यावर त्यांना होणारा त्रास थांबणे

आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया

यानंतर मला एकदम जाग आली. ‘हे स्वप्न मला का पडले ?’, हे मला समजत नव्हते; म्हणून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्या सेवेत असणार्‍या साधकाला भ्रमणभाष करून या स्वप्नाबद्दल सांगितले. त्याने लगेच सद्गुरु गाडगीळकाकांना भ्रमणभाष दिला. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाका मला म्हणाले, ‘‘सकाळपासून माझा घसा खवखवत आहे. हळदीचे पाणी आणि पातळ औषधही घेतले आहे. अजूनही घसा खवखवत आहे. अजून काही औषध घ्यायला हवे का ?’’ मी त्यांना त्यासाठी एक गोळी दिली आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांना विचारल्यावर कळले की, त्यांना होणारा त्रास आता पूर्णपणे थांबला आहे.

३. सद्गुरु गाडगीळकाकांशी बोलल्यावर साधकाला होणारा आध्यात्मिक त्रासही दूर होणे

‘गुरु प्रत्येक साधकाची किती काळजी घेतात ?’ हे या अनुभूतीतून माझ्या लक्षात आले. वरील प्रसंगात मला सकाळपासून तीव्र त्रास होत होता; पण स्वप्न पडल्यानंतर मी जेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांशी बोललो, तेव्हापासून मला सकाळपासून होणारा आध्यात्मिक त्रास एकदम नाहीसा झाला आणि मला उत्साह वाटू लागला.

‘माझा त्रास दूर होण्यासाठीच देवाने मला ही अनुभूती दिली’, असे माझ्या लक्षात आले.’

– आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया, फोंडा, गोवा. (२९.५.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.