विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्‍वनिष्‍ठ शांत बसणार नाहीत ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

जिल्‍हाधिकार्‍यांकडून शिष्‍टमंडळाला आश्‍वासन

जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

कोल्‍हापूर – विशाळगडावर जी १६४ अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती तात्‍काळ भूईसपाट करावीत, तेथील रेहान मलीक दर्गा परिसरात झालेले अवैध बांधकाम तात्‍काळ हटवण्‍यात यावे, तेथे भरणारा उरूस तात्‍काळ बंद व्‍हावा यांसह अन्‍य मागण्‍यांसाठी कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांना ‘विशाळगडमुक्‍ती आंदोलना’च्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले. या संदर्भात जिल्‍हाधिकार्‍यांनी ‘अतिक्रमण काढून टाकण्‍यासाठी आमच्‍याकडून प्रयत्न चालू आहेत. पावसाळ्‍यानंतर हे अतिक्रमण काढून टाकले जाईल’, असे आश्‍वासन दिले. विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्‍वनिष्‍ठ शांत बसणार नाहीत, अशी माहिती माजी आमदार आणि विशाळगडमुक्‍ती आंदोलनाचे निमंत्रक श्री. नितीनराजे शिंदे यांनी दिली. जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन दिल्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या संदर्भात ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे श्री. सुनील घनवट म्‍हणाले, ‘‘आज सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, गडप्रेमी संघटना यांच्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले. या संदर्भात जिल्‍हाधिकार्‍यांशी सविस्‍तर चर्चा झाली. या संदर्भातील विषय सध्‍या उच्‍च न्‍यायालयात असून त्‍यासाठी बाजू मांडण्‍यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अतिक्रमण काढून टाकण्‍याच्‍या संदर्भात प्रशासन कोणतीही हयगय करणार नाही. विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्‍या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्‍याही परिस्‍थितीत मागे घेण्‍यात येणार नाहीत, असे आश्‍वासन जिल्‍हाधिकार्‍यांनी शिष्‍टमंडळास दिले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणाची शेवटची वीट निघेपर्यंत आमचा निर्धार चालू राहील.’’

या प्रसंगी सांगली येथील अधिवक्‍त्‍या (सौ.) स्‍वाती शिंदे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे शहर कार्यवाह श्री. आशीष लोखंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, गजापूर येथील श्री. नारायण वेल्‍हाळ, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. सचिन देसाई, श्री. भूषण गुरव, श्री. संजय (बापू) तांदळे, हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री अभिमन्‍यू भोसले, रवींद्र वादवणे, आशीष साळुंखे, चेतन भोसले, अजय काकडे, पंकज कुबडे, सांगली येथील हिंदू एकताचे श्री. संजय जाधव, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांसह अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित होते.

विशाळगडावरील रेहान मलिक दर्गा भागातील अतिक्रमण

जिल्‍हाधिकार्‍यांना दिलेल्‍या निवेदनात करण्‍यात आलेल्‍या काही मागण्‍या..

१. पन्‍हाळा ते विशाळगड हा रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर येण्‍यासाठी बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्‍या समाधीस्‍थळी भव्‍य ऐतिहासिक स्‍मारक उभे करा.

२. विशाळगडावरील पडझड झालेली सर्व मंदिरे आणि पुरातन वास्‍तू यांचा जिर्णोद्धार करावा, तसेच माहिती फलक गडावर ठिकठिकाणी लावण्‍यात यावेत.

३. श्री वाघजाई मंदिराच्‍या समोर असलेल्‍या झर्‍याच्‍या पाण्‍याला रेहानबाबाचे तीर्थ सांगून लोकांची फसवणूक करण्‍यात येत आहे, ती त्‍वरित थांबवण्‍यात यावी.

४. विशाळगडावर भरवण्‍यात येणार्‍या उरुसात सहस्रो कोंबड्या आणि बकर्‍या यांच्‍या कत्तली करण्‍यात येतात, तरी त्‍या उरुसावर शासनाकडून तात्‍काळ बंदी घालण्‍यात यावी.