रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर २५० किलोंहून अधिक चरस जप्त

  • अनुमाने १० कोटी रुपयांचे सापडले चरस

  • बोर्‍या येथेही सापडले २० किलो चरस

रत्नागिरी – जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे, लाडघर, केळशी, कोळथरे, मुरुड, बुरोंडी, दाभोळ या ७ समुद्रकिनार्‍यांवर १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरस या अमली पदार्थाची बेवारस पाकिटे सापडल्याने सीमा शुल्क अधिकारी आणि पोलीस सतर्क झाले होते. त्यानंतर १९ ऑगस्टलाही गुहागर तालुक्यातील बोर्‍या येथील समुद्रकिनार्‍यावर २० किलोंच्या २ गोण्या आढळल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण २५० किलो वजनाचे चरस सापडले आहे. चरसची ही सर्व पाकिटे सीमा शुल्क विभागाने कह्यात घेतली आहेत. आतापर्यंत सापडलेल्या या ‘चरस’ची किंमत ४०० रुपये प्रति ग्रॅम बाजारभावाने अनुमाने १० कोटी रुपये आहे.

ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय सीमा शुल्क विभागाला आहे.

संशयास्पद गोणीची माहिती देण्याचे आवाहन

याविषयी सीमा शुल्क अधीक्षक जय कुमार यांनी सांगितले की, गुहागर तालुक्यात, तसेच अन्य कोणत्याही समुद्रकिनार्‍यांवर निळ्या रंगाच्या गोण्या सापडल्यास त्याची माहिती द्यावी. ७८८८११११८४, ७८२७९८०६०५ या भ्रमणभाष क्रमांकावर या संशयास्पद निळ्या गोणींची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भातील माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. सीमा शुल्क अधिकारी किंवा पोलीस यांनी धाड टाकून एखाद्याकडील अमली पदार्थांचे पाकीट जप्त केल्यास मात्र संबंधितांवर ‘नार्कोटिक्स’ नियमातंर्गत कारवाई केली जाणार आहे.