हिंदु धर्मानुसार आचरण केल्‍यावर एकही मुलगी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसणार नाही ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

राहुरी (अहिल्‍यानगर) येथील ‘लव्‍ह जिहाद आणि हिंदु संस्‍कृतीचे महत्त्व’ या विषयावर कार्यक्रम

कु. क्रांती पेटकर

राहुरी (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – सध्‍या लव्‍ह जिहादच्‍या आणि महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला वयोमर्यादाही राहिलेली नाही. अगदी लहान मुलींपासून ते ७० वर्षांच्‍या वयस्‍कर महिलेवरही अत्‍याचार झाल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत. लव्‍ह जिहादच्‍या माध्‍यमातून धर्मांधांनी आतापर्यंत ६० हून अधिक हिंदु मुलींची निर्घृण हत्‍या केल्‍याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. केवळ महाराष्‍ट्रात १८ ते २५ वर्षे वयोगटातील सरासरी ७० मुली प्रतिदिन बेपत्ता होत असल्‍याची बातमी नुकतीच प्रसारित झाली होती. या मागील कारण शोधले, तर हिंदु मुलींना धर्मशिक्षण दिले जात नाही. त्‍यामुळे आपली संस्‍कृती, परंपरा त्‍या विसरत चालल्‍या आहेत आणि याचाच अपलाभ हे धर्मांध घेतात. हिंदु धर्मानुसार आचरण केल्‍यावर एकही मुलगी लव्‍ह जिहादमध्‍ये फसणार नाही, असे उद़्‍गार हिंदु जनजागृती समितीच्‍या रणरागिणी शाखेच्‍या कु. क्रांती पेटकर यांनी काढले. त्‍या राहुरी येथील पांडुरंग लॉन्‍स या ठिकाणी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने ‘लव्‍ह जिहाद आणि हिंदु संस्‍कृतीचे महत्त्व’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होत्‍या. या मार्गदर्शनाचा लाभ २५० हून अधिक महिला आणि मुली यांनी घेतला.

या वेळी धर्म जागरण मंच रणरागिणीच्‍या सौ. नलिनीताई वायाळ म्‍हणाल्‍या, ‘‘लव्‍ह जिहादमध्‍ये फसलेल्‍या महिला आणि मुली यांचे जाणीवपूर्वक धर्मांतर करणे, वेश्‍या व्‍यवसाय करण्‍यास भाग पाडणे, त्‍यांची विक्री करणे, इत्‍यादी अपप्रकार केले जातात. हिंदु मुलींना लव्‍ह जिहादमध्‍ये फसवल्‍यानंतर धर्मांधांना हिंदु मुलींच्‍या जातीनुसार पैसे दिले जातात. मुलींना शाळा महाविद्यालयांबाहेर हे धर्मांध त्रास देतात किंवा खोटे नाते सांगून ओळख काढून प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवतात. या संदर्भात सर्वांनी आपली माता आणि भगिनी यांना जागृत करावे.’’