चीनच्या सैन्याकडून भारतात घुसखोरी ! – राहुल गांधी

गांधी देशाविरुद्ध षड्यंत्र रचत असल्याचा भाजपचा आरोप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी लडाखच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी २० ऑगस्ट या दिवशी पेंगोंग येथे त्यांचे वडील तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करत भाजप सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी आरोप केला, ‘चीनच्या सैन्याने भारताच्या सीमेत घुसखोरी केली आहे. येथील जनता तुम्हाला सर्व माहिती देईल.’ त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देतांना भाजपचे नेते रवींद्र रैना म्हणाले की, भारताची भूमी हिरावून घेण्याचे धाडस कुणामध्येही नाही. राहुल गांधी भारताच्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. ते सैन्याचा मनोबल डळमळीत करत आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, याच काँग्रेसने ‘हिंदी-चिनी भाई भाई’ची घोषणा देत भारताची ४५ सहस्र चौरस किलोमीटर भूमी चीनच्या घशात घातली आहे.