सनातनला दोषी ठरवणार्‍या अंनिसच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या प्रकरणात अंनिसवाल्यांनी सनातन संस्थेला दोषी ठरवल्याचे प्रकरण

मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंनिसचे अविनाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून दाभोलकर आणि पुरोगामी यांच्या हत्यांना सनातन संस्थेला दोषी ठरवले आहे. याचा समाचार सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रक काढून घेतला आहे. त्यात म्हटले आहे की, दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्‍यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे. त्यासाठी आम्ही अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहोत. त्यामुळे सनातन संस्थेच्या अपकीर्तीची मोहीम चालवणार्‍यांनी वक्तव्ये करतांना हे लक्षात घेऊन बोलावे, अशी चेतावणी सनातन संस्थेने दिली आहे.

श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रक काढून याविषयी माहिती दिली आहे.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा पूर्ण प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांचे अनुयायी आणि नातेवाईक अशा २ वेगवेगळ्या गटांतून चालू आहेत. त्यात वर्षभर निष्क्रीय असलेले दोन्ही गट आता २० ऑगस्ट या दिवशी कार्यक्रमांची भडीमार करून ‘आम्हीच कसे खरे अनुयायी आहोत’, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. या स्पर्धेत हमीद दाभोलकर गटाने थेट ‘हास्यजत्रा’वाल्यांना पाचारण करून दाभोलकरांच्या स्मृतीदिनाला हास्यास्पद केले आहे, तर अविनाश पाटील यांच्या दुसर्‍या गटाने अविवेकी होऊन न्यायालयाने निकाल देण्याची वाट न पाहता थेट सनातन संस्थेला दोषी ठरवून टाकले आहे. आता त्यांनी सनातन संस्थेला केवळ फाशीची शिक्षा देणेच शिल्लक ठेवले आहे; मात्र अविवेकाच्या अतिरेकामुळे ते विसरले आहेत की, भारतात राज्यघटना, कायदा आणि न्यायालय या व्यवस्था आहेत. त्यात सनातन संस्था कुठेही दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही.

३. एकीकडे अविनाश पाटील गट सनातनला दोषी ठरवत आहे, तर दुसर्‍या गटाचे प्रमुख असलेले हमीद दाभोलकर हे ‘आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे’, असा धादांत खोटा प्रचार करत आहेत. न्यायालयात खटला चालू असतांना, असे काही घडलेले नसतांना असे खोटे पसरवणे म्हणजे अंनिसवाल्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नसल्याचेच लक्षण आहे; मात्र या दोन्ही गटांच्या वर्चस्ववादाच्या ‘भोंदूगिरी’त सनातनचा ‘बळी’ दिला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे सनातन संस्थेने म्हटले आहे.

अंनिसचे अविनाश पाटील यांनी सनातन संस्थेवर केलेले बिनबुडाचे आरोप

अविनाश पाटील यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ‘डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या अन्वेषणात गती घेऊन तातडीने संबंधितांवर कारवाई झाली असती, तर पुढील ३ विचारवंतांचे खून झाले नसते. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, माजी कुलगुरु डॉ. एम्.एम्. कलबुर्गी, निर्भिड पत्रकार गौरी लंकेश यांचेही त्याच पद्धतीने खून झाले आहेत. सध्या अन्वेषणात पुढे आलेल्या गोष्टींमध्ये या चौघांचे खून हे विशिष्ट कट्टरपंथीय सनातन संस्थेने केलेले आहेत’, असे म्हणत सनातन संस्थेची अपकीर्ती केली होती.