मीरा-भाईंदर आणि ठाणे भागात मोठ्या प्रमाणात भू माफिया निर्माण झाले आहेत ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – मीरा-भाईंदर आणि ठाणे भागांत मोठ्या प्रमाणात भू माफिया निर्माण झाले आहेत. हे शेतकर्‍यांच्या भूमी घेतात. त्यानंतर शेतकर्‍यांना धमक्या देण्यासाठी अंडरवर्ल्डचे साहाय्य घेतात, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिला असल्याचेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मीरा-भाईंदर येथील गुंड प्रवृत्तीचे श्यामसुंदर अग्रवाल यांनी अनेक शेतकर्‍यांना फसवून त्यांची भूमी हडप केली असल्याचा गंभीर प्रकार सभागृहात लक्षात आणून त्यांना अटक करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘‘अग्रवाल यांच्यावर ३२ गुन्हे आहेत. या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करून ३ मासांत अहवाल सादर केला जाईल. हे गुन्हे पोलिसांच्या संगनमताने घडले असतील, तर त्याचीही चौकशी करण्याचा आदेश देण्यात येईल’’, असे सांगितले.